ती वयाच्या बाराव्या - तेराव्या वर्षी घराबाहेर पडते. घरातील दारिद्र्य - उपासमार हे कारण आहेच पण त्याही पेक्षा महत्वाचे कारण म्हणजे तिला बाहेरचं जग खुणावतं. जळजळीत वास्तवात जगणाऱ्या या मुलींना बाहेर पडून वेगळ्या जगात जगण्याची आस तयार होते आणि मागचा पुढचा कोणताही विचार न करता एवढ्याशा लहान वयात ती घरातून बाहेर पडते. स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी. खरं तिचं हे वय शिक्षण घेण्याचं पण तिला खुणावतात झगमगाट असलेली मोठी शहरे. दिल्ली, कलकत्ता, बेंगलोर, मुंबई, गोवा या अशा शहरांमध्ये ती कशी आणि कधी येउन पोहोचते ते तिच तिलाच कळत नाही. ती एकटीच नसते तिच्यासारख्या अनेकजणी याच पद्धतीने - याच मार्गाने आलेल्या असतात. हे उदाहरण आहे झारखंड - छत्तीसगढ आणि ओरिसा मधून पळून जाणाऱ्या मुलींचं. दिल्लीसारख्या शहरात या राज्यातील अनेक अल्पवयीन मुली घरा -घरांमधून दिसतात. घरकाम करण्यासाठी या मुलींना ठेवलं जातं. घरकामासाठी या मुली सहजपणे मिळाव्यात यासाठी दिल्लीमध्ये ब्युरो ऑफिसची भली मोठी बाजारपेठच आहे. हि बाजारपेठ आणि इथली ब्युरो ऑफिस बघितल्यावर आश्चर्य वाटल्या शिवाय राहणार नाही. भाजी -पाला विकत घ्यायला जावं तसं इथे या बाजारपेठेत मुलीना घरकामासाठी आणायला दिल्लीतील प्रतिष्ठित घरातील व्यक्ती येत असतात. . साधारणपणे सहा -सात वर्षांपूर्वी एका संशोधन प्रकल्पाच्या निमित्ताने या मुलीना भेटण्याची, त्यांच्या व्यथा जाणून घेण्याची संधी मिळाली. एक वर्षभर वारंवार झारखंड- छत्तीसगढ-ओरिसा या राज्यांमध्ये या संशोधन प्रकल्पासाठी प्रवास होत होता.एका आगळ्या-वेगळ्या व्यवस्थेची यामुळे ओळख झाली. या तीन राज्यांमधून अचानकपणे गायब होणाऱ्या मुलींचीं संख्या खूप मोठी आहे. वृत्तपत्रांमधून येणारी आकडेवारी कायम लक्ष वेधून घेत असते. शाळेत शिकणाऱ्या मुली अचानकपणे गायब होतात - हि मोठी आश्चर्याची आणि चिंतेची बाब आहे. या राज्यांमधून रोजगाराच्या शोधत अनेक पुरुष परराज्यांध्ये 'पलायन' करत असतात. गावच्या गावं ओस पडलेली दिसतात. पण गेल्या पंचवीस तीस वर्षात या भागातील मुलीदेखील 'पलायन' करू लागल्या आहेत. आपल्या छोट्याशा गावात राहण्यापेक्षा दिल्ली - मुंबई सारख्या मोठ्या शहरात मोलकरीण म्हणून काम करणं त्यांना जास्त आवडत. ना शिक्षण, ना समज असणारं वय अशा अवस्थेत त्या दिल्लीत येऊन पोहचतात आणि व्यवस्थेच्या बळी ठरतात. आपल्या देशात बालकामगार विरोधात कायदा आहे. पण दिल्ली सारख्या देशाची राजधानी असलेल्या शहरातच या कायद्याची उघडपणे पायमल्ली होताना दिसते. कायदे कोणासाठी आहेत? असा प्रश्न पडतो. बालकामगार ठेवणं हा गुन्हा असला तरी अनेक घरात घरकामासाठी या अल्पवयीन मुलीच हव्या असतात. घरातील एक कोपरा या मुलीना देतात. वर्षानुवर्षे एकाच घरात राहून काम करणाऱ्या अनेकजणी इथे सापडतात. घरकामासाठी एखादी महिला त्यांना नको असते. अगदी त्या घरातील मालकीण देखील महिला नको एखादी मुलगीच द्या अशी मागणी करत असते. घरकामासाठी चोवीसतास घरात राहणारी महिला नको असते. उद्या काही विपरीत घडायला नको, महिलेची जबाबदारी घेण्यापेक्षा लहान मुलगी ठेवली म्हणजे तिला धाक दाखवून ओरडून - प्रसंगी मारून तिच्याकडून काम करून घेता येतं असा या मालकिणींना वाटत असतं. जे एखाद्या महिलेच्या बाबत घडू शकत ते या छोट्या मुलीच्या बाबत घडणे थोडेच राहते. उलट लहान मुलीला घाबरवून धमकावून तिच्यावर वाट्टेल तसे अत्याचार होत असतात. त्या घरातील पुरुषही या मुलींचा गैरफायदा घेतात. अगदी सरसकट सगळीकडे हेच चित्र आहे असं म्हणता येणार नाही पण जी उदाहरणं आत्तापर्यंत समोर आली आहेत त्यामुळे याची दुसरी बाजू उघड झाली आहे. ब्युरो ऑफिसकडून फसवणूक या तीन राज्यांमधून मुलींना दिल्लीला आणण्यासाठी ब्युरो ऑफिसने त्या त्या भागात खास एजंट नेमले आहेत. मुलींना फूस लावून दिल्लीला घेऊन यायचं काम हे एजंट करतात. त्याचा मोबदला म्हणून त्यांना प्रत्येक मुलीमागे काही कमिशन मिळत असतं. याशिवाय गावातून आधी दिल्लीला गेलेली एखादी मुलगी देखील एजंटचे काम करते. ती गावातील आपल्या मैत्रीणीना प्रलोभनं दाखवून दिल्लीला घेऊन जाते तिलाही त्याबद्दल कमिशन मिळतं. ज्या प्रमाणे लग्न जुळवणाऱ्या संस्थामध्ये वधू-वराची फोटो सहित माहिती दिलेली असते त्याच पद्धतीने हि ब्युरो ऑफिसेस या मुलींच्या फोटोसहित माहितीचा अल्बम तयार करतात. तिथे येणाऱ्या प्रत्येकाला हा अल्बम दाखवला जातो. मुलीचा फोटो-माहिती बघूनच मुलगी घरी कामासाठी घेऊन जातात. ब्युरो ऑफिसवाले यातून रग्गड पैसे कमवतात. प्रत्येक मुलीमागे त्यांना दोन-तीन महिन्यांचा पगार मिळत असतो. काही ब्युरोवाले मुलींच्या हातात पगार पडू देत नाहीत. त्या घरमालकीणीला मुलीचा पगार ब्युरो ऑफिस मध्ये जमा करायला लावतात. मुलगी कधी सुट्टीसाठी घरी जाणार असेल तर तिला पैसे मिळतात. यामुळे त्यामुलीला माहितच नसतं कि आपल्याला नेमका पगार किती मिळतो? एकप्रकारे तिची फसवणूक होत असते. एक मोठ्ठ राकेट पद्धतशीरपणे कार्यरत आहे. यामध्ये बहुसंख्य मुली आपल्या पालकांना न सांगताच पळून जातात. तर काही प्रमाणात पालकच आपल्या मुलीना पाठवतात. घरात चूल पेटण्याचा प्रश्न असतो. खरा प्रश्न हा आहे कि या मुलींचं भवितव्य काय? मुलींचं भवितव्य अधांतरी शिक्षण अर्धवट सोडून दिल्यामुळे नीट लिहिता - वाचता येतं नाही, व्यवहार ज्ञान नाही. दिल्लीसारख्या ठिकाणी आल्यावर कोणावर विश्वास ठेवावा आणि ठेवू नये हे समजत नाही. यातून बऱ्याच जणींची वेगवेगळ्या मार्गाने फसवणूक होत असते. वर्षातून काही दिवस सुट्टी घेऊन या मुली घरी येतात ती वेळ गाठून यातील काही मुलींना त्यांच्या गावी -त्यांच्या घरी गाठलं होतं. काही मुली शहरातल्या वातावरणात राहायला सरावल्या आहेत असं जाणवलं. दिल्लीतील मोठमोठ्या बंगल्यात राहून आल्यावर गावात वीज - पाणीची सोय नसलेल्या घरात राहणे त्यांना आवडत नाही. मुलगी पैसे कमवून आणते म्हणून तिला घरात एकप्रकारचा मान हि असतो. पण तो जो वर पैसे मिळतात तो वरच असतो. गावात या मुलीना 'दिल्ली रिटर्न' असं म्हणून हेटाळलं जातं. साधारणपणे वयाच्या बाराव्या ते तेराव्या वर्षापासून ते पस्तीशी-चाळीशी पर्यंत दिल्लीमध्ये काम मिळतं. पस्तीशी नंतरच्या महिलांना इथे काम मिळत नाही. चाळीशी नंतर येणारी आजारपणं, त्यासाठी करावे लागणारे औषधपाणी नको असते. म्हणजेच त्या महिलेवर कोणताही खर्च करायची मानसिकता नसते. जवळ-जवळ पस्तीशी नंतर या सर्वजणींना आपल्या गावी परतण्या वाचून पर्याय नसतो. एक तर या दिल्ली मध्ये राहून काम करतात म्हणून यांच्याशी लग्न करायला कोणीही तयार नसतं आणि पस्तीशी नंतर गावी परतल्यावर लग्नाचं वयही राहत नाही. इथल्या अनेक गावांमध्ये अशा अनेक अविवाहित महिला आढळून येतात. आयुष्यातील महत्वाची वर्ष अति श्रम करण्यात जातात आणि जेव्हा स्वतः साठी म्हणून जगायची वेळ येते तेव्हा मात्र त्यांचा बरोबर कोणी नसतं. कमवत नाही म्हणून घरातील अन्य व्यक्ती हि पाठ फिरवतात. हि या मुलींची शोकांतिका आहे. आपली समाजव्यवस्था एकप्रकारे या परिस्थितीला कारणीभूत आहे. बालकामगार विरोधी कायदा असून हि अनेक घरात अल्पवयीन मुलींना कामाला ठेवलं जातं. याच वयातील मुली पाहिजे असा आग्रह धरला जातो आणि याच मागणीमुळे आज झारखंड -छत्तीसगढ आणि ओरिसा सारख्या राज्यांमधून दररोज असंख्य मुलींना फसवून आणलं जातं. जेव्हा हि आपल्या सारख्या सुसंस्कृत घरातून मागणी होणार नाही तेव्हा आपोआप हा गैर व्यवहार थांबेल आणि मुली देखील एक सुखी जीवन जगू शकतील. गरज आहे त्यांचं किमान दहावी पर्यंतच शिक्षण पूर्ण करून देण्याची, त्यांना त्यांच्याच राज्यात रोजगार मिळवून देण्याची. हि मागणी आत्ता तरी फक्त घरकामगार म्हणून असली तरी उद्या समजा हीच मागणी देहविक्रय करण्याकडे वळली तर या मुली कोणत्या मार्गाला आणि कोणत्या जगात असतील याची कल्पना करवत नाही. म्हणूनच या व्यवहाराला वेळीच लगाम घातला गेला पाहिजे. कायद्याचा आधार घेऊन कडक कारवाई झाली पाहिजे हीच तळमळीची इच्छा !
Wednesday, April 17, 2013
जंगलच्या राण्यांची शोकांतिका...
Subscribe to:
Post Comments (Atom)
hi manaswini, not able to read this as it is in marathi...but will attempt, still better, will google translate and understand. but i am so so sure this is worth a read...kudos:)
ReplyDelete