Wednesday, April 17, 2013

'ती' चं जग...

कधी अचानकपणे कोणी तरी आपल्याला शिकवून जातं. न विसरता येणारं. अशी माणसं आपल्याला कायम भेटली पाहिजेत असं मला वाटतं . या वेळेस मात्र मला एक बारा- तेरा वर्षाची मुलगी शिकवून गेली. तिचं बोलणं आजही आठवतंय. आजच्या पिढीला नावं ठेवणारे अनेक आपल्या आजूबाजूला दिसतात. पण नावं ठेवण्याइतके सगळेचजण बिघडलेत अशी परिस्थिती नाहीये. या पिढीतही चांगल्या - वाईटाची जाणीव असलेले काहीजण आहेत. त्यातलंच हे उदाहरण. गोव्यात लोखंडाच्या खाणी असलेल्या गावांमध्ये 'सेंटर फॉर डेव्हलपमेंट प्लानिंग अन्ड रिसर्च' या संस्थेच्या माध्यमातून तिथल्या ग्रामस्थांसाठी, महिलांसाठी आणि शालेय विद्यार्थी- किशोरवयीन मुलींसाठी विविध प्रकल्प राबवले जातात. यातील किशोरवयीन मुलींच्या गटप्रमुख मुलींचा अभ्यासवर्ग होता. साधारणपणे दहा -बारा वर्षाच्या मुलींपासून ते पंधरा -सोळा वर्षाच्या मुलींचे गट तिथल्या गावांमध्ये आमच्या समन्वयकांनी तयार करून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे प्रशिक्षण, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, आरोगयाची काळजी असे अनेक कार्यक्रम घेतले जातात. या अशाच गटातील त्याच वयोगटातील गटप्रमुख मुलींचा हा अभ्यास वर्ग होता. त्यातील एक सत्र या गटप्रमुख मुलींना येणाऱ्या अडचणींवर होतं. सुरुवातीला कोणीच बोलायला तयार नव्हतं. एक एक करून हळूहळू काहीजणी बोलायल्या लागल्या. त्यात एक बारा -तेरा वर्षाची मुलगी होती. तिच्या बोलण्यात आत्मविश्वास जाणवत होता. तिने आधी बाकीच्या मुली काय बोलतायत हे ऐकलं आणि मग सर्वात शेवटी आपलं म्हणणं मांडल. बोलायला सुरुवात करताना पहिल्यांदा तिने आम्हालाच प्रश्न, ' किशोरी विकास प्रकल्प' फक्त मुलींसाठीच का?.... मान्य आहे कि आमचा विकास व्हावा, गावातल्या आम्ही सगळ्याजणींनी एकत्र येउन काही चांगले उपक्रम करावेत हा उद्देश आहे आणि आम्हाला याचा खूप उपयोगही होतोय. पण हा फक्त आमच्यासाठी नको. तो मुलांसाठीही असला पाहिजे.' आम्हाला अपेक्षित नव्हतं कि यांच्यातलीच कोणी चिमुरडी असं काही बोलू शकेल. तिचा मुद्दा विचार करायला लावणारा होता. मुलगी वयात आली कि घरी - दारी सगळेजण तिला तिने कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, तिने स्वतःला कसं जपलं पाहिजे इ . इ सांगत असतात. अनेकांचा तिच्यावर पहारा असतो. ती कुठे जाते- येते, तिचे मित्र-मैत्रीणी कोण आहेत.... याकडे लक्ष दिले जाते. हेच मुलगा वयात आल्यावर होतं का? मुलगी वयात आल्यावर तिच्यामध्ये आणि आई मध्ये नकळतपणे एक मैत्रीचं, एकमेकींची काळजी घेणारं नातं तयार होतं. पण मुलगा वयात आला कि तसं घडत का? कित्ती आया आपल्या वयात आलेल्या मुलांना समजावून सांगतात. किती वडील आपल्या वयात आलेल्या मुलाला त्याने कसे वागले पाहिजे विशेषतः मैत्रिणींशी..हे सांगतात? मुलींना मात्र मित्रांशी वागताना एक विशिष्ट अंतर ठेवून वागलं पाहिजे अस सांगितलं जातं. भविष्यात येऊ शकणाऱ्या समस्यांची जाणीव करून दिली जाते. इथे मुलींनाच का? आणि मुलांना का नाही.. हा प्रश्न नाहीये. इथे जडण -घडण कोणाची कशी होतेय हे सांगण्याचा प्रयत्न आहे. आज आजूबाजूला घडणाऱ्या घटना बघितल्या कि मुला - मुलीना वाढवताना होणारा भेद प्रकर्षाने जाणवतो आणि कदाचित त्यातूनच आज ज्या समस्यांचा भडका उडलेला दिसतोय. मुलीं इतकीच मुलांचीही जबाबदारीने वागायची गरज आहे. मागे काही वर्षान पूर्वी पुण्यातील बस प्रवासात महिलांचा होणारा लैंगिक छळ या विषयावर भरपूर महिलांशी - मुलींशी बोलत होते. सवयीप्रमाणे घरात त्यावर आम्हा सर्वांची चर्चा व्हायची. पण त्या वेळेस पहिल्यांदा असं वाटला कि आपण बायकांशी बोलतोय तर पुरुषांशीही बोललं पाहिजे त्याची सुरुवात घरातूनच केली. माझ्या पाठच्या दोन भावंडांपासून. ते बस प्रवासात कसे वागतात? एखादी महिला शेजारी बसली असेल तर त्यांचा वर्तन कसं असतं अशा अनेक प्रश्नांवर त्यांच्याशी बोलले होते. या पद्धतीचा बोलणं हि आवश्यक असतं हे त्यांच्याशी बोलल्यावर जाणवलं. ज्या पद्धतीने आमची चर्चा झाली त्यानंतर महिलांनाही बस मध्ये आरक्षण दिले पाहिजे याबाबत माझ्या भावंडांचही सकारात्मक मत तयार झालं. मिटिंग मध्ये बोलून गेलेल्या त्या चिमुरडीचं म्हणणंही हेच होतं कि आमच्या इतकीच आता मुलांनाही बरे -वाईट काय आहे हे सांगण्याची सध्या गरज आहे. तो कसा हि वागला तरी काय फरक नाही पडणार. फरक पडायला तो थोडाच मुलगी आहे.. असा विचार करून आपण आपल्या मुलाचं भविष्य बिघडवून ठेवतोय. या आशाच विचारांमुळे मुलांमध्ये टोकाची कृती करण्याची वृत्ती वाढली आहे. १८ वर्षाच्या आतील वयाचा मुलगा २३ वर्षाच्या मुलीवर अतिशय पाशवी पद्धतीने बलत्कार करतो आणि आपल्या अन्य मित्रांनाही तिच्यावर बलात्कार करायला चिथावणी देतो हि कसली लक्षणं आहेत? हे कसलं धाडस आहे. आजच्या पिढीत रुजू पाहणाऱ्या पौरुषत्वच्या विचित्र कल्पना वेळीच बदलायला हव्यात. खरच मुलांसाठीही किशोर विकास प्रकल्प हि काळाची गरज आहे. दिल्लीतील बलात्काराच्या घटनेनंतर अनेकांनी अनेक वक्तव्य केली. काहींनी मुलीनांच सल्ले दिले. त्यातील काही सल्ले तर अतिशय विचित्र होते. जवळ एखादं हत्यार बाळगावं, कोणी त्रास देऊ लागलं तर त्या वेळी हे उपयोगी पडेल. मिरची पूड, पिपर स्प्रे जवळ बाळगावा. त्रास देणाऱ्याला मारा पण जीवे मारू नका. जखमी करा असले काही जणांनी सल्ले दिले. म्हणजे स्वतःचं संरक्षण स्वतःच करा. आम्ही काही करू शकत नाही. आणि परत हे सगळे सल्ले फक्त मुलीनांच. गुन्हा करणारा कोणी दुसराच पण त्याची शिक्षा कोणा दुसऱ्याला. अजब मानसिकता आहे आपल्या समाजाची. या समस्यांचं मूळ आपल्या घरात आहे. आपली मानसिकता बदलण्यापासून. घरातील मुलगी -मुलगा यांना समान पातळीवर वाढवण्याची. दोघानांही आपापल्या जबाबदारींची जाणीव करून देण्याची. मध्यंतरी एक मैत्रीण भेटली. ती तिच्या मुलाबद्दल बोलत होती. ' मुलगी असती तर बरं झालं असतं! मुलाला वाढवणं अवघड होऊन बसलंय. समाजात वावरताना त्याने एक चांगली व्यक्ती म्हणून वावरल पाहिजे. माणूसपण जपलं पाहिजे. एवढीच अपेक्षा आहे त्याच्याकडून…' असं ती बोलून गेली. तिच्या बोलण्यात एक प्रकारची काळजी, तळमळ जाणवत होती जी सहसा मुलग्यांच्या आयांमध्ये दिसत नाही. मुलगी म्हणजे संपूर्ण घराची अब्रू त्यामुळे मुलगी म्हणजे जोखीम अशी काहीशी विचारसरणी बाळगणारे उजळ माथ्याने समाजात वावरतात. पण हीच जोखीम मुलाच्याबाबत असू शकत नाही का? हे कसं विसरतात. एका छोट्या मुलीने आम्हा सर्वांची विचार करण्याची पद्धत बदलवली. ती स्वतः जे अनुभवत आहे तेच तिच्या बोलण्यात व्यक्त झालं. पण तिच्यामुळे आमची काम करण्याची पद्धतही आम्हाला बदलावी लागली. अशा अनेक मुली आपल्या आजुबाजूला आहेत त्यांना प्रोत्साहन देऊन पुढे आणलं पहिजे.

No comments:

Post a Comment