Wednesday, April 17, 2013

बदलत्या नात्यांचे विश्व…


कारगील युद्धानंतर एका वेगळ्या समाज रचनेचं अंतरंग समजून घेण्याची संधी मिळाली. लष्करात भरती झालेले जवान- त्यांचे कुटुंबीय, सैनिक कल्याण बोर्डसारखी रचना, सैनिकांच्या वसाहती, प्रत्येकाच्या हुद्द्या प्रमाणे त्यांना मिळणारा मान- त्यांना मिळणाऱ्या सवलती अशा अनेक गोष्टी समजत गेल्या आणि हे आणखी एक वेगळं विश्व आहे याची खात्री पटली. कारगील युद्ध झालं आणि अनेक बातम्यांमध्ये एका बातमीने लक्ष वेधून घेतलं. शहीद झालेल्या जवानांमध्ये नुकतेच लग्न झालेल्या जवानांची सर्वाधिक संख्या होती. म्हणजेच तरूण विधवांचीही संख्या अधिक असणार हे आलंच. त्यानंतर काही दिवसातच भारत सरकारच्या गृहमंत्रालयाकडून या युद्ध विधवांच्या एकूण स्थितीवर सर्व्हेक्षण करून एक अहवाल तयार करून देण्याचं काम आमच्या संस्थेकडे आले. पश्चिम बंगाल, पंजाब, उत्तर प्रदेश - उत्तरांचल, राजस्थान, आणि कर्नाटक या पाच राज्यातील युद्ध विधवांच्या सद्य स्थितीवर अहवाल बनवून देण्याचं काम होतं. यात फक्त कारगील युद्धानंतरच्या विधवांना भेटायचं नव्हतं तर त्या पूर्वी होऊन गेलेल्या भारत - चीन, भारत - पाकिस्तान या युद्धातील विधवांना भेटून त्यांच्याशी चर्चा करण्याचं काम होतं. यामध्ये कारगील युद्धामुळे अगदी नुकत्याच विधवा झालेल्या आणि तीस वर्षापूर्वीच्या युद्धांमुळे झालेल्या विधवाअशा दोन वेगवेगळ्या काळातील विधवांच्या सद्यस्थितीचा मागोवा घ्यायचा होता. कारगील युद्ध सुरु झालं मे ते जून महिन्याच्या काळात. त्या आधीचा सगळा काळ हा लग्न सराईच्या दिवसांचा होता. खास लग्नासाठी सुट्टी काढून आलेल्या अनेक जवानांना अचानक कारगील सुरु झाल्यामुळे घाईत लग्न उरकून युद्धासाठी परत जावं लागलं. युद्धात शहीद झालेल्यांमध्ये याच जवानांची संख्या अधिक होती. त्यामुळे या प्रकल्पात तरुण युद्ध विधवांना भेटायला जाणं आणि त्यांच्याशी संवांद साधणं हे मोठ्ठ अवघड काम होतं. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे अनुभव आले. खूप वेळा अस्वस्थ करून सोडणारी परिस्थिती समोर आली. तरुण मुलगा गेलेल्या आईची, नुकताच लग्न झालं आणि आपल्या नवऱ्याशी नीट बोलता हि आलं नाही, त्याचा सहवासही लाभला नाही अशा नव्या नवरीची कहाणी हृदयद्रावक होती तर काही वेळेला दोन्ही बाजूने एकमेकींची (सासूच्या आणि सुनेच्या) फसवणूक झाल्याच्या गोष्टी समोर आल्या. याच काळात शहीद जवानांच्या शवपेट्यांचा घोटाळा उघडकीस आला त्याने फार अश्चर्य वाटलं नाही पण निव्वळ पैशांसाठी शहीद जवानाच्या आई-वडिलांनी नुकत्याच विधवा झालेल्या सुनेचा अतोनात छळ केला आणि काही ठिकाणी या शहीद जवानांच्या बायकांनी सासू -सासऱ्यांचा छळ केला या दोन विरोधाभास असणाऱ्या परिस्थितीला अनुभवून अधिक आश्चर्य वाटलं. हातात आलेला पैसा हे याला एकच कारण होतं. कारगील युद्धानंतर इतक्या वेगवेगळ्या पातळींवरून वेगवेगळ्या पद्धतीची मदत येत होती यात आर्थिक मदतीचा खूप मोठा भाग होता. शहीद जवानाच्या परिवाराला चाळीस लाखाहून अधिक आर्थिक मदत मिळाली आणि इथूनच नात्यांचे रंग बदलू लागले. अमृतसर जवळच्या एका खेड्यात एका युद्धविधवेचं घर शोधत गेलो होतो. भलं मोठं आंगण, ऐसपैस घर, गोठ्यात गायी -म्हशी - बैल, दोन मोठ्ठाले ट्राक्टर एका सधन शेतकऱ्याचं घर आहे हे जाणवत होतं. जिला आम्ही शोधत गेलो होतो तिचं त्या शहीद जवानांबरोबर चार - पाच वर्षांपूर्वी लग्न झालं होतं आणि तिला एक छोटा मुलगाही होता. तिचं नाव सांगताच ती घरातून लगेच बाहेर आली. तिला बघून ती विधवा आहे असं वाटत नव्हतं. त्या वेळेला घरात अन्य कोणी नसल्यामुळे तिच्याशी मोकळेपणाने बोलता आलं.युद्धानंतर तिला जी आर्थिक मदत मिळणार होती त्याचे स्वरूप तिच्या सासरच्या लोकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आपली या सुनेच्या पुनर्विवाहाची तयारी सुरु केली. मिळणारी रक्कम घराच्या बाहेर जाऊ नये म्हणून तिचं लग्न तिच्या लहान दिराबरोबर ठरवलं. हा दीर तिच्यापेक्षा १६ वर्षांनी लहान. ज्याला आपल्या मुलाप्रमाणे वागवलं त्याला नवरा म्हणून स्वीकारणे अवघड होते. हातात सर्व रक्कम येताच काही दिवसातच तिचं लग्न सोळा वर्षांनी लहान असलेल्या दिराबरोबर लावून देण्यात आलं. पैशांमुळे नातीही बदलली. मुला प्रमाणे असलेला दीर आता तिचा नवरा बनला होता. आम्ही तिच्या घरी गेलो तेव्हा तो तिथेच होता. हि नाती समजून घेण्याचं त्याचं वय नाही हे जाणवत होतं. प्रश्न होता तिला या परिस्थितीत कसं वाटतं याचा. ' मी तशीही एकटी कुठे गेले असते? माहेरी जाण्यासारखी परिस्थिती नाही. किमान अशा परिस्थितीत इथे मी सुरक्षित राहू शकते. मला समजून घेणारी व्यक्ती आज या जगात नाहीये पण मी आता या लोकांची परिस्थिती समजून घायला हवी न ! मालमत्तेची वाटणी नको म्हणून मी हा पर्याय निवडला आणि या लग्नाला तयार झाले. वाईट या एकाच गोष्टीचा वाटतंय कि माझ्या दिराला बायको म्हणून कोणी चांगली मुलगी मिळाली असती पण परिस्थितीमुळे त्याला माझा स्वीकार करावा लागला. आमच्यामध्ये नवरा-बायकोचं नातं तयार होणं अवघड आहे.' तिच्यातील समंजसपणा बघून मी थक्क झाले. परिस्थिती माणसाला काय - काय करायला भाग पाडते याचं हे बोलका उदाहरण होतं. वाद- क्लेष होऊ नयेत, परिवार तुटू नये आणि आपल्या मुलाचं भविष्य बघून ती त्याच घरात त्या घरतल्या लोकांच्या सुखासाठी राहिली आणि हा निर्णय घेताना तिला तिच्या लहान दिराबद्दल ही वाईट वाटत होतं हे हि महत्वाचं ना ! हे उदहरण पाठीशी घेऊन मी बाहेर पडलेखूप दिवस हि गोष्ट, ती युद्ध विधवा आणि तिचा छोटा दीर डोळ्या समोरून जात नव्हते. बदलती नाती आणि त्यातील गहिऱ्या छटा विचार करायला भाग पडत होत्या. काही दिवसातच धक्का देणारा आणखी एक अनुभव या परवासात मिळाला. पश्चिम बंगालमधील दर्जिलिग हे गाव जगाच्या नकाशावर पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे पण बंगालमध्ये घरटी एका माणसाहून अधिक व्यक्ती लष्करामध्ये असणारे हे एकमेव गाव आहे. दार्जिलिंगजवळ एका खेड्यातील हि घटना आहे. युद्ध विधवेचं नाव विचारत तिच्या घरी पोहोचलो. तर ती तिथे राहत नसल्याचं समजलं. त्या घरात फक्त वृद्ध सासू एकटीच असल्याचं दिसत होतं. कोणाचाही सोबत नाही. एकुलता एक मुलगा शहीद झालेला अशा परिस्थितीत तिच्याशी बोलणं म्हणजे तिला त्रास देण्यासारखाच वाटू लागलं. तिची सून कुठे आहे असं विचारल्यावर ती अशी काही चिडली कि तिला शांत करणं हे एक काम होऊन बसलं. पण तिच्या त्या बडबडीने सगळी सत्य परिस्थिती समोर आली. मुलगा सुट्टीला आला म्हणून त्याचं जमवून ठेवलेलं लग्न लावलं होतं. पै-पै करून जोडलेले पैसे त्याच्या लग्नात खर्च केले. लग्नाला पंधरा दिवसा नाही होत कि मुलाला युद्धासाठी लगेच परत जावं लागलं आणि त्यातच तो शहीद झाला. त्यानंतर आलेली सगळी रक्कम घेऊन सून जी पसार झाली ती त्यानंतर घरी परत आली नाही. तिच्या माहेरच्या लोकांचाही काही पत्ता नाही. ते हि त्यांचं रहात घर सोडून कुठे निघून गेले हे समजलं नाही. आज हि म्हातारी आई निराधार झालीय. स्वतःचं घर आहे म्हणून तेवढा तरी तिला आसरा आहे. तिचा नात्यांवरचा विश्वास उडालाय हे तिच्या बोलण्यातून जाणवत होतं. मन सुन्न करणाऱ्या आठवणी या प्रकल्पानंतर साठून राहिल्या. त्या आमच्या अहवालाचा भाग नसल्या तरी त्या विसरता येणार नाहीत अशा आहेत. पैशांमुळे - पैशांपुढे नात्यांना काही अर्थ नाही का? गेलेल्या नवऱ्याच्या, पोटच्या गेलेल्या मुलाच्या दुख्खापेक्षा पैसा मोठा होऊन बसला. आपल्याला त्या शहीद झालेल्या जवनाबद्द्ल वाटतं तेवढं त्याच्या कुटुंबियांनाही वाटतं नाही हे प्रत्यक्ष बघायला मिळालं. नात्यांचे बदलते रंग ओळखायला लावणारा धडा यातून नक्कीच शिकायला मिळाला.

1 comment:

  1. aaplya aayushyashee samantar asha bryach barya vait goshtee ghadat astat. Ek lakshat yete ki sangharsha ha aahech aani durdaivane aaplyach mansanshee.

    ReplyDelete