Sunday, June 16, 2013

नव्या युगातील नव्या समस्या...

बदल स्वीकारायला थोडा काळ जावा लागतो म्हणतात तेच खरं. मी रहात असलेला पिंपरी चिंचवड भाग गेल्या दहा- पंधरा वर्षात खूप बदललाय. लोकांचं राहणीमान बदललं, गावपणाच्या खूणा पुसल्या जाऊन टोलेजंगी इमारती, मोठ - मोठे हौसिंग प्रोजेक्ट उभे राहिले. पवना नदीचं बाराही महिने खळखळणारे पाणी उपलब्ध असल्यामुळे शेती मोठ्या प्रमाणावर केली जायची. आज जिथे आय. टी पार्कचं जंगल उभं आहे तिथे काही वर्षांपूर्वी संपन्न अशी शेती होती. आता हा सगळा भाग एकदम बदलून गेलाय. पण आजही दर रविवारी या भागात आठवडी बाजार भरतो. त्यातलं चित्र मात्र थोडसं बदललंय. जीन्स -टी शर्ट, शॉर्ट्स, मिनी स्कर्ट घातलेल्या गृहिणी, नोकरीच्या निमित्ताने एकट्या राहणाऱ्या मुली या बाजारात आठवड्याची खरेदी करायला आलेल्या दिसतात. आय.टी कंपनीमध्ये काम करणाऱ्या भला मोठा पगार कमविणाऱ्या या मुली सुरुवातीला सगळ्यांच्या कुतूहलाचा विषय होता. हिंजवडी, थेरगाव, वाकड, बालेवाडी हा भाग अगदी ग्रामीण नसला तरी सहजपणे बदल स्वीकारणाराही नव्हता. आपल्या घरातील मुलींना चांगलं उच्च शिक्षण मिळावं म्हणून जवळच १५ कि.मी वर असलेल्या पुणे शहरात पाठवायला तयार नसलेल्या पालकांना आजूबाजूला घडणारे बदल न रुचणारे होते. बेंगलोर, दिल्ली-चंदिगढ, चेन्नई अशा वेगवेगळ्या भागातून मुली नोकरीसाठी एकट्या येतात काय आणि चोघी -पाच जणी एका प्लाट मध्ये एकत्र राहतात काय… हे सगळं त्यांच्यासाठी आश्चर्य वाटणारं होत. त्यामुळे सुरुवातीची काही वर्ष त्या चर्चेचा आणि टीकेचा विषय बनून गेल्या. मध्यंतरी एका कंपनीसाठी आय. टी क्षेत्रात काम करणाऱ्या मुलींच्या दैनंदिन सोयी सुविधांबाबत असणाऱ्या गरजा जाणून घेण्यासाठी सर्व्हे करायचं काम आमच्या संस्थेकडे आलं. कंपनीला या मुलींना लागणाऱ्या दैनंदिन सोयी सुविधांमध्येच फक्त रस होता. अर्थातच कंपनीचा पुढचा प्रोजेक्ट या मुलींच्या गरजांवर आधारित असल्यामुळे त्यांच्या समस्या जाणून घेण्यात त्यांना अजिबात रस नव्हता. अशी चर्चा करायची संधी परत मिळेल न मिळेल असा विचार करून मी मात्र तयार केलेल्या प्रश्नावली मध्ये समस्यांबाबत काही प्रश्न वाढवले. मला आय.टी क्षेत्रात आडनीड वेळेत काम करणाऱ्या या मुलींचं विश्व कसं आहे हे जाणून घ्यायचं होतं. बाहेरून चकचकीत दिसणारं जग खरंच तसं आहे का? आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्यावर महिलांची निर्णय क्षमता वाढते असं कायम म्हणलं जातं पण प्रत्यक्षात आर्थिक सुबत्ता - आर्थिक स्वातंत्र्य आल्यानंतर या मुलींना निर्णय स्वातंत्र्य मिळालं आहे का? आर्थिक सुबत्तेमुळे यांच्या आयुष्यात कोणते बदल झाले आहेत असे अनेक प्रश्न मनात होते ज्यांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करत होते. लग्न झालेल्या आणि अविवाहित असणाऱ्या दोन्ही प्रकारच्या मुलींशी संवाद साधला. मुळात त्यांच्याशी अशा विषयावर कोणी चर्चा करायला उत्सुक आहे याचंच त्यांना आश्चर्य वाटलं. आर्थिक सुबत्ता आहे म्हणून सगळ्या समस्या संपल्या असं कसं होईल!! उलट पैसा आहे म्हणून जरा वेगळ्याच समस्या तयार होत आहेत असं जाणवलं. जबाबदारीचे पद, विचित्र अशी कामाची वेळ, घरातील जबाबदाऱ्या यासगळ्याचा ताण निश्चितच मनावर असतो आणि असा ताण अन्य कोणत्याही प्रकारची नोकरी करणाऱ्या व्यक्तीवर असू शकतो. आठवड्यातले पाच दिवस मर मर काम आणि 'वीकएन्ड'ला आराम - एन्जॉय करण्याचं 'कल्चर' वाढल्याचं या मुली सांगत होत्या. खूप मोकळेपणाने सुरु झालेली चर्चा वेगवेगळ्या मुद्द्यांकडे वळत होती. लग्न न केलेल्या मुली लग्न झालेल्या मुलींचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होत्या. 'मी आणि माझा नवरा आम्ही दोघेही आय.टी फिल्ड मध्ये वेगवेगळ्या कंपनीमध्ये नोकरीला आहोत. आम्हाला साडे तीन वर्षाची मुलगी आहे. दोघांचे कुटुंबीय दिल्लीमध्ये असतात. तिथले व्याप सोडून इथे येउन राहणं त्यांना जमत नाही. दोघेही नोकरी करत असल्यामुळे मुलीला कुठे ठेवायचं हा प्रश्न आमच्या समोर आला म्हणून मग आम्ही दिवसभरासाठी एका बाईला कामाला ठेवलं. मुलीला वेळ देत येत नाही याची मनात बोच असते. आमच्या शिक्षणासाठी आई - वडिलांनी काढलेलं कर्ज, घरासाठी घेतलेलं कर्ज आणि भविष्यातील अन्य काही महत्वाच्या सोयी सुविधा- गरजा यासाठी यापद्धतीची नोकरी खूप गरजेची आहे.' हिंजवडीमधील एका नामांकित कंपनी मध्ये काम करणारी एक जण मोकळेपणाने बोलत होती तिचा मुद्दा पकडून आणखी एक जण बोलू लागली …. ' आम्ही भरपूर कमवतो. नक्कीच आर्थिक स्वातंत्र्य आम्हाला आहे. पण यासगळ्याचा मनापासून आनंद काही घेता येत नाही. घरात अत्याधुनिक उपकरणं आहेत. ए. सी आहे. किचनमधील काम लवकरात लवकर उरकावं यासाठी सर्व प्रकारच्या सोयी करून घेतल्या आहेत. पण यासगळ्याचा उपभोग घ्यायला आम्ही घरात हजर नसतो. आमच्या घरातील मोलकरीण या सगळ्याचा उपभोग घेत असते' हसत हसत बोलत एकदम स्वतःच्याच मर्मावर बोट ठेवल्यासारखं झालं. अनेकींनी तिच्या या बोलण्याला दुजोरा दिला. या क्षेत्रात काम करणाऱ्या मुला-मुलींची आर्थिक परिस्थिती सुधारली त्यामुळे आता लग्न पद्धतीमध्येहि बदल झाले आहेत. मुला - मुलींना कंपनी कडून मिळणारं आर्थिक 'प्याकेज' हेच लग्न जमविण्याचं मध्यम पण आहे आणि अडचणही आहे. मुलाच्या बरोबरीने मुलीलाही प्याकेज असलं पाहिजे असं बघून मुलगी पंसंत करणारे अनेकजण इथे दिसतात. आय. टी मध्ये नोकरी करणारी मुलगी असली पाहिजे हि मुला पेक्षा मुलाच्या आई -वडिलांचीच मागणी असल्याचं अनेकींनी बोलून दाखवलं. त्याच क्षेत्रातली सून हवी हा अट्टहास आणि शिवाय सुनेनं घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडाव्यात अशी अपेक्षा ही असते यामध्ये आमची तारेवरची कसरत होते असं काहीजणींनी सांगितलं. 'आम्ही भरपूर कमवतो म्हणजे आम्हाला काहीच समस्या नसणार… यांना कसलं आलंय दु:ख!! असंच अनेकांना वाटतं. आर्थिक विवंचना नसल्या तरी त्यातून आलेल्या वेगळ्या समस्या आमच्या समोर आहेत. मुलांना वेळ देऊ शकत नाही यामुळे मनात एकप्रकारची अपराधीपणाची भावना असते आणि या भावनेतून खूपदा मुलांचे नको इतके लाड केले जातात. ते मागतील ती वस्तू त्यांना आणून देतो. शनिवार - रविवार म्हणजे आमच्यातील आपराधीपणाची भावना पुसून टाकण्यासाठीचा दिवस असतो.… ' बेंगलोर मधून नुकतीच पुण्यात स्थायिक झालेली नंदिनी सांगत होती. ' तरी आता बऱ्याच कंपनींनी वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या काहीजणींना घरून काम करण्याची परवानगी दिलीय म्हणून थोडा फार फरक पडू लागलाय. बदलही होतील हळूहळू. खरंतर कामाच्या गरजे प्रमाणेच इथल्या कामाची रचना आहे. पण या रचनेशी मिळतं जुळतं घेण्याची मानसिकता आजू बाजूला दिसत नाही. पुण्यातील आय.टी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांवर बलात्कार घडण्याच्या अनेक घटना मधल्या काही वर्षांमध्ये घडल्या आणि इथल्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणी वर आला आणि तेव्हा पासून इथे काम करणाऱ्या महिलांकडे- त्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने बघितले जाऊ लागले. मी आजवर वेगवेगळ्या स्तरातील महिलांना भेटले त्यांच्याशी संवाद साधला, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पण आय.टी क्षेत्रात काम करणाऱ्या मुलींशी संवाद साधण्याचा हा अनुभव बराच वेगळा होता. समस्या नाहीयेत असं नाही. समस्या आहेत हे ही नाकारून चालणार नाही. मनस्विनी प्रभुणे manswini-prabhune.blogspot.com

No comments:

Post a Comment