Sunday, April 21, 2013

आभासी दुनियेतून वास्तव जगात….

अभासी दुनियेत न जगता वास्तवाचा विचार करून, वास्तव स्वीकारून जगायला मला माझ्या बाबांनी शिकवलं. मराठी भाषेची विद्यार्थिनी असल्यामुळे आणि एकूणच घरातील वातावरणामुळे सतत पुस्तकांच्या सान्निध्यात असायचे. कथा - कविता - कादंबरी - ललितलेख - वैचरिक लेख जे मिळेल ते वाचून काढायचे. पण फक्त पुस्तकी किंवा कथा - कवितांमधील अभासी जगात रमू नये म्हणून बाबांनी माझ्याबाबत आणि माझ्या भावंडांबाबत जाणीवपूर्वक काही गोष्टी केल्या. त्यासर्व गोष्टींचा आज आम्हाला माणूस म्हणून जगताना उपयोग होतोय. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाची गोष्ट आहे. साधारणपणे बी. ए च्या पहिल्या - दुसऱ्या वर्षाला असेन. तेव्हा यमगरवाडीचा प्रकल्प आकार घेऊ लागला होता. भटक्या विमुक्तांचे आणि विशेष करून पारधी - फासे पारधी जमातीचं संघटन करण्यात बाबांना यश मिळालं होतं. बाबा दिवस - रात्र त्याच विषयात कार्यरत होते. माझी परीक्षा संपून सुट्टी लागली होती आणि एक दिवस बाबांनी मला अचानक सांगितलं , ' तुला काही दिवस फासे - पारध्यांचा पालावर जाऊन राहायचंय. स्वरूपवर्धिनी नावाची संस्था आहे त्यातील महिला कार्यकर्त्या या पालांवर काही दिवस जाऊन पारधी कुटुंबासोबत रहाणार आहेत. तू हि त्यांच्या बरोबर जा आणि काही दिवस राहा.' ज्यांच्या पालांवर जाऊन राहायचं होतं ते सर्वजण माझ्या चांगले परीचायचे होते. घरी अनेक वेळा राहून गेले होते. अडीआडचणी काळात आमचं घर त्यांना कायम उघडं असायचं. पण त्यांच्या पालांवर जाण्याचा हा माझा पाहिलाच अनुभव होता. पारधी कुटुंबाचं आणि विशेष करून पारधी महिलांचं जीवन यानिमित्ताने जवळून अनुभवायला मिळणार होतं ते त्यांच्यासोबत राहून. स्वरूपवर्धिनीच्या वर्षाताई, लताताई, अजून एकजण आणि मी अशा चौघी जणी मगरसांगवी या गावी पोहोचलो. मगरसांगवी हे गाव तुळजापूर आणि सोलापूर यांच्या मध्ये आहे. या गावात…. खरं तर गावात म्हणता येणार नाही, गावाबाहेर गायरानाच्या जागेत पारध्यांची पालं होती. तिथे राहून आम्ही आसपासच्या गावातील पारध्यांच्या पालांवर जाऊ शकत होतो म्हणून मगरसांगवीला आमचा मुक्काम ठरला. इथल्या पालांवर राहणाऱ्या काही बायकांना मी ओळखत होते. नवऱ्याला पोलिसांनी पकडून नेल्यानंतर यातील काहीजणी थेट आमच्या घरी यायच्या. काखोटीला एक मूल आणि सोबत अजून दोन - तीन मुलांना घेऊन त्या यायच्या. कधी बाबा घरात असायचे कधी नसायचे पण त्या प्रत्येक वेळेला आमच्या आईने त्यांना समजून घेतलं. मुलांच्या अंगावर कपडे नाहीत. त्या महिलेच्या अंगावर कित्येक वर्ष न बदलेली साडी असा अवतार असायचा. तिच्या मुलांना माझ्या लहान भावाचे कपडे देणे आणि तिला एखादी साडी देणे, तिची समस्या ऐकून घेऊन योग्य सल्ला देणे. वेळ प्रसंगी वकिलांना फोन करणे अशी सर्व कामं बाबांच्या गैरहजेरीत आई करायची. पारधी महिलांशी अशा प्रसंगामधून माझी ओळख झाली. पण त्यांचं आयुष्य जवळून अनुभवलं ते प्रत्यक्ष त्यांच्या बरोबर राहिले तेंव्हा. आम्ही मगरसांगवी गावात पालावर जाण्याआधीच आम्ही तिथे राहणार आहोत हि बातमी गावात पसरली होती. गावात पोलिस पाटीलाचं बऱ्यापैकी मोठं घर होतं. ' तुम्ही पालावर कशाला राहता. तुमची सोय आम्ही गावात करतो. तुम्ही गावात राहा. ' असं आम्ही तिथे पोहोचल्यावर त्या पोलिस पाटीलांनी आम्हाला सांगितलं होतं. अर्थातच आम्ही तसं काही केलं नाही. आम्ही ठरल्याप्रमाणे पालांवरचं गेलो. आम्ही तिथे राहून आपल्याला काय काय करायचंय त्या कामाची एक चौकट केली होती. पण प्रत्यक्षातील परिस्थिती, काही आधी पासून मनात गृहीत धरलेल्या गोष्टी यामुळे त्यातील बऱ्याच गोष्टी गुंडाळून ठेवाव्या लागल्या आणि समोर येणाऱ्या अनुभवावरून नव्याने मांडणी करावी लागली. या सगळ्या प्रयोगामागचं एक महत्वाचं कारण होतं ते पारधी कुटुंबाची आणि विशेषतः महिलांची जीवनशैली, त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या महिलांसाठी काय करता येऊ शकतं याबाबत विचार करणं. पारधी कुटुंबं मोठ्या प्रयत्नातून संघटीत झाली होती पण यांच्या मागे भटकण्याचा - गुन्हेगारीचा लावलेला शिक्का मिटवून टाकण्यासाठी त्यांच्यासाठी काही ठोस प्रयत्न करण्याची गरज होती. त्याची हि सुरुवातच होती असं म्हणता येईल. इथे आल्यावर अगदी त्यांच्या पद्धतीने राहणं शक्य नव्हतं हे लगेच लक्षात आलं. पारधी बायका आणि मुलं हे घरोघरी मागून आणल्या नंतर जेवतात. धन्याचा एक कण नाही तिथे चूल पेटणारचं कशी? त्यामुळे मागून आणल्याशिवाय त्यांचं जेवण होत नाही. लहान मुलांना मागायला पाठवलं कि त्यांच्यावर कीव करून, त्यांच्या चेहऱ्याकडे बघून काही न काही मिळतं हे माहित असल्यामुळे मागून आणायचं काम हे त्या कुटुंबातील लहानमुलांकडे असतं. पुढे यमगरवाडीला पारधी आणि भटके-विमुक्त समाजातील मुलांसाठी निवासी शाळा सुरु झाल्यावर अनेक पालक आपल्या मुलांना पाठवायला तयार नव्हते कारण मुलं निवासी शाळेत गेल्यावर मागून कोण आणणार? बाकीच्यांना जेवायला कसं मिळणार आणि मुलांनाही तीच सवय असल्यामुळे शिजवलेलं चांगलं-चुंगलं त्यांना आवडायचं नाही. त्यांना शीळं अन्न आणि मागून आणलेलं अन्नच आवडायचं. त्यांची हि सवय मोडायची असेल तर पहिल्यांदा त्याच्या जवळ शिजवण्यासाठी धन्य असलं पाहिजे आणि धान्य आणायचं म्हणजे पैसा आणि पैसा हवा असेल असेल तर हाताला काम असलं पाहिजे असं सगळं चक्र डोळ्यासमोर उभं राहिलं आणि हे वाटतं तितकं सोप्पं नव्हतं. अचानकपणे हे सगळे बदल घडवणे सोप्पं काम नाही हे जाणवलं. रोज संध्याकाळी सगळी कामं आवरली कि आम्ही पालांवरच्या सगळ्या महिलांना एकत्र करून त्यांच्याशी गप्पा मारायचो. त्यांना काही शिकवायला आलोय असा अविर्भाव त्यात नव्हता खरतरं नकळतपणे त्यांच्याकडून आम्हीच शिकत होतो. लहान वयात होणारे लग्न, नवऱ्या मुलाकडून मुलीच्या आई वडिलांना मिळणारा हुंडा आणि यातून प्रसंगी मुलींना पैशांसाठी विकण्याची वाढलेली प्रवृत्ती, नवऱ्याला चोरी- दरोड्याच्या आरोपाखाली अटक झाल्यावर त्याला सोडवण्यासाठी करावी लागणारी प्रयत्नांची शर्थ, प्रसंगी पोलिसांकडून होणारे शारीरिक आत्याचार आणि हे सगळं सहन करूनही याच महिलांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना उकळत्या तेलात हात घालून द्यावी लागणारी अग्नी परीक्षा या आणि याहून अनेक गोष्टी या महिलांशी बोलताना समजत गेल्या. यातील काही गोष्टी प्रत्यक्ष अनुभवयला मिळाल्या. यातील कोणत्याही समस्येला सहजपणे हात घालता येईल अशा नव्हत्या. महिलांना मिळणारी जनावरासारखी वागणूक आणि तरीही खचून न जाता मोठ्या कणखरपणे आपल्या विस्कटलेल्या कुटुंबाला उभं करण्यासाठी जीवापाड झटणारी पारधी बाई एखाद्या लढवैय्या सारखी वाटू लागली. आपल्या आजुबाजूला विलक्षण असं काहीतरी घडतंय आणि आपण काहीच करू शकत नाही असे हे दिवस होते. त्या महिलांसोबत राहून, त्यांच्या समस्या बघून अस्वस्थता आणखीनच वाढली. शहरी आणि सुरक्षित वातावरणात राहिल्यामुळे - वाढल्यामुळे त्यांच्यातील अंधश्रद्धा आणि रूढी -परंपरांची चीड येऊ लागली. त्यासगळ्यांचे संदर्भ समजून घेण्याचं ते वयही नव्हतं. कदाचित माझीच आकलन शक्ती कमी पडली असेल. यानिमित्ताने बाबांचं काम किती अवघड आहे हे समजलं. या मुक्कामामुळे बाबांच्या कामातील अडचणी समजून घेता आल्याच पण समाजातील अगदी सर्वात शेवटचा घटक म्हणता येईल अशा पारधी समाजातील महिला आणि त्याचं जीवन, समस्या जवळून अनुभवता आल्यामुळे पुढच्या आयुष्यात अन्य समाजातील महिलांच्या समस्या समजून घेणे, त्याचे अर्थ लावणे थोडे सोप्पे गेले. मला वाढण्यासाठी हा अनुभव खूप वेगळा आणि महत्वाचा होता.

Wednesday, April 17, 2013

बदलत्या नात्यांचे विश्व…


कारगील युद्धानंतर एका वेगळ्या समाज रचनेचं अंतरंग समजून घेण्याची संधी मिळाली. लष्करात भरती झालेले जवान- त्यांचे कुटुंबीय, सैनिक कल्याण बोर्डसारखी रचना, सैनिकांच्या वसाहती, प्रत्येकाच्या हुद्द्या प्रमाणे त्यांना मिळणारा मान- त्यांना मिळणाऱ्या सवलती अशा अनेक गोष्टी समजत गेल्या आणि हे आणखी एक वेगळं विश्व आहे याची खात्री पटली. कारगील युद्ध झालं आणि अनेक बातम्यांमध्ये एका बातमीने लक्ष वेधून घेतलं. शहीद झालेल्या जवानांमध्ये नुकतेच लग्न झालेल्या जवानांची सर्वाधिक संख्या होती. म्हणजेच तरूण विधवांचीही संख्या अधिक असणार हे आलंच. त्यानंतर काही दिवसातच भारत सरकारच्या गृहमंत्रालयाकडून या युद्ध विधवांच्या एकूण स्थितीवर सर्व्हेक्षण करून एक अहवाल तयार करून देण्याचं काम आमच्या संस्थेकडे आले. पश्चिम बंगाल, पंजाब, उत्तर प्रदेश - उत्तरांचल, राजस्थान, आणि कर्नाटक या पाच राज्यातील युद्ध विधवांच्या सद्य स्थितीवर अहवाल बनवून देण्याचं काम होतं. यात फक्त कारगील युद्धानंतरच्या विधवांना भेटायचं नव्हतं तर त्या पूर्वी होऊन गेलेल्या भारत - चीन, भारत - पाकिस्तान या युद्धातील विधवांना भेटून त्यांच्याशी चर्चा करण्याचं काम होतं. यामध्ये कारगील युद्धामुळे अगदी नुकत्याच विधवा झालेल्या आणि तीस वर्षापूर्वीच्या युद्धांमुळे झालेल्या विधवाअशा दोन वेगवेगळ्या काळातील विधवांच्या सद्यस्थितीचा मागोवा घ्यायचा होता. कारगील युद्ध सुरु झालं मे ते जून महिन्याच्या काळात. त्या आधीचा सगळा काळ हा लग्न सराईच्या दिवसांचा होता. खास लग्नासाठी सुट्टी काढून आलेल्या अनेक जवानांना अचानक कारगील सुरु झाल्यामुळे घाईत लग्न उरकून युद्धासाठी परत जावं लागलं. युद्धात शहीद झालेल्यांमध्ये याच जवानांची संख्या अधिक होती. त्यामुळे या प्रकल्पात तरुण युद्ध विधवांना भेटायला जाणं आणि त्यांच्याशी संवांद साधणं हे मोठ्ठ अवघड काम होतं. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे अनुभव आले. खूप वेळा अस्वस्थ करून सोडणारी परिस्थिती समोर आली. तरुण मुलगा गेलेल्या आईची, नुकताच लग्न झालं आणि आपल्या नवऱ्याशी नीट बोलता हि आलं नाही, त्याचा सहवासही लाभला नाही अशा नव्या नवरीची कहाणी हृदयद्रावक होती तर काही वेळेला दोन्ही बाजूने एकमेकींची (सासूच्या आणि सुनेच्या) फसवणूक झाल्याच्या गोष्टी समोर आल्या. याच काळात शहीद जवानांच्या शवपेट्यांचा घोटाळा उघडकीस आला त्याने फार अश्चर्य वाटलं नाही पण निव्वळ पैशांसाठी शहीद जवानाच्या आई-वडिलांनी नुकत्याच विधवा झालेल्या सुनेचा अतोनात छळ केला आणि काही ठिकाणी या शहीद जवानांच्या बायकांनी सासू -सासऱ्यांचा छळ केला या दोन विरोधाभास असणाऱ्या परिस्थितीला अनुभवून अधिक आश्चर्य वाटलं. हातात आलेला पैसा हे याला एकच कारण होतं. कारगील युद्धानंतर इतक्या वेगवेगळ्या पातळींवरून वेगवेगळ्या पद्धतीची मदत येत होती यात आर्थिक मदतीचा खूप मोठा भाग होता. शहीद जवानाच्या परिवाराला चाळीस लाखाहून अधिक आर्थिक मदत मिळाली आणि इथूनच नात्यांचे रंग बदलू लागले. अमृतसर जवळच्या एका खेड्यात एका युद्धविधवेचं घर शोधत गेलो होतो. भलं मोठं आंगण, ऐसपैस घर, गोठ्यात गायी -म्हशी - बैल, दोन मोठ्ठाले ट्राक्टर एका सधन शेतकऱ्याचं घर आहे हे जाणवत होतं. जिला आम्ही शोधत गेलो होतो तिचं त्या शहीद जवानांबरोबर चार - पाच वर्षांपूर्वी लग्न झालं होतं आणि तिला एक छोटा मुलगाही होता. तिचं नाव सांगताच ती घरातून लगेच बाहेर आली. तिला बघून ती विधवा आहे असं वाटत नव्हतं. त्या वेळेला घरात अन्य कोणी नसल्यामुळे तिच्याशी मोकळेपणाने बोलता आलं.युद्धानंतर तिला जी आर्थिक मदत मिळणार होती त्याचे स्वरूप तिच्या सासरच्या लोकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आपली या सुनेच्या पुनर्विवाहाची तयारी सुरु केली. मिळणारी रक्कम घराच्या बाहेर जाऊ नये म्हणून तिचं लग्न तिच्या लहान दिराबरोबर ठरवलं. हा दीर तिच्यापेक्षा १६ वर्षांनी लहान. ज्याला आपल्या मुलाप्रमाणे वागवलं त्याला नवरा म्हणून स्वीकारणे अवघड होते. हातात सर्व रक्कम येताच काही दिवसातच तिचं लग्न सोळा वर्षांनी लहान असलेल्या दिराबरोबर लावून देण्यात आलं. पैशांमुळे नातीही बदलली. मुला प्रमाणे असलेला दीर आता तिचा नवरा बनला होता. आम्ही तिच्या घरी गेलो तेव्हा तो तिथेच होता. हि नाती समजून घेण्याचं त्याचं वय नाही हे जाणवत होतं. प्रश्न होता तिला या परिस्थितीत कसं वाटतं याचा. ' मी तशीही एकटी कुठे गेले असते? माहेरी जाण्यासारखी परिस्थिती नाही. किमान अशा परिस्थितीत इथे मी सुरक्षित राहू शकते. मला समजून घेणारी व्यक्ती आज या जगात नाहीये पण मी आता या लोकांची परिस्थिती समजून घायला हवी न ! मालमत्तेची वाटणी नको म्हणून मी हा पर्याय निवडला आणि या लग्नाला तयार झाले. वाईट या एकाच गोष्टीचा वाटतंय कि माझ्या दिराला बायको म्हणून कोणी चांगली मुलगी मिळाली असती पण परिस्थितीमुळे त्याला माझा स्वीकार करावा लागला. आमच्यामध्ये नवरा-बायकोचं नातं तयार होणं अवघड आहे.' तिच्यातील समंजसपणा बघून मी थक्क झाले. परिस्थिती माणसाला काय - काय करायला भाग पाडते याचं हे बोलका उदाहरण होतं. वाद- क्लेष होऊ नयेत, परिवार तुटू नये आणि आपल्या मुलाचं भविष्य बघून ती त्याच घरात त्या घरतल्या लोकांच्या सुखासाठी राहिली आणि हा निर्णय घेताना तिला तिच्या लहान दिराबद्दल ही वाईट वाटत होतं हे हि महत्वाचं ना ! हे उदहरण पाठीशी घेऊन मी बाहेर पडलेखूप दिवस हि गोष्ट, ती युद्ध विधवा आणि तिचा छोटा दीर डोळ्या समोरून जात नव्हते. बदलती नाती आणि त्यातील गहिऱ्या छटा विचार करायला भाग पडत होत्या. काही दिवसातच धक्का देणारा आणखी एक अनुभव या परवासात मिळाला. पश्चिम बंगालमधील दर्जिलिग हे गाव जगाच्या नकाशावर पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे पण बंगालमध्ये घरटी एका माणसाहून अधिक व्यक्ती लष्करामध्ये असणारे हे एकमेव गाव आहे. दार्जिलिंगजवळ एका खेड्यातील हि घटना आहे. युद्ध विधवेचं नाव विचारत तिच्या घरी पोहोचलो. तर ती तिथे राहत नसल्याचं समजलं. त्या घरात फक्त वृद्ध सासू एकटीच असल्याचं दिसत होतं. कोणाचाही सोबत नाही. एकुलता एक मुलगा शहीद झालेला अशा परिस्थितीत तिच्याशी बोलणं म्हणजे तिला त्रास देण्यासारखाच वाटू लागलं. तिची सून कुठे आहे असं विचारल्यावर ती अशी काही चिडली कि तिला शांत करणं हे एक काम होऊन बसलं. पण तिच्या त्या बडबडीने सगळी सत्य परिस्थिती समोर आली. मुलगा सुट्टीला आला म्हणून त्याचं जमवून ठेवलेलं लग्न लावलं होतं. पै-पै करून जोडलेले पैसे त्याच्या लग्नात खर्च केले. लग्नाला पंधरा दिवसा नाही होत कि मुलाला युद्धासाठी लगेच परत जावं लागलं आणि त्यातच तो शहीद झाला. त्यानंतर आलेली सगळी रक्कम घेऊन सून जी पसार झाली ती त्यानंतर घरी परत आली नाही. तिच्या माहेरच्या लोकांचाही काही पत्ता नाही. ते हि त्यांचं रहात घर सोडून कुठे निघून गेले हे समजलं नाही. आज हि म्हातारी आई निराधार झालीय. स्वतःचं घर आहे म्हणून तेवढा तरी तिला आसरा आहे. तिचा नात्यांवरचा विश्वास उडालाय हे तिच्या बोलण्यातून जाणवत होतं. मन सुन्न करणाऱ्या आठवणी या प्रकल्पानंतर साठून राहिल्या. त्या आमच्या अहवालाचा भाग नसल्या तरी त्या विसरता येणार नाहीत अशा आहेत. पैशांमुळे - पैशांपुढे नात्यांना काही अर्थ नाही का? गेलेल्या नवऱ्याच्या, पोटच्या गेलेल्या मुलाच्या दुख्खापेक्षा पैसा मोठा होऊन बसला. आपल्याला त्या शहीद झालेल्या जवनाबद्द्ल वाटतं तेवढं त्याच्या कुटुंबियांनाही वाटतं नाही हे प्रत्यक्ष बघायला मिळालं. नात्यांचे बदलते रंग ओळखायला लावणारा धडा यातून नक्कीच शिकायला मिळाला.

जंगलच्या राण्यांची शोकांतिका...


ती वयाच्या बाराव्या - तेराव्या वर्षी घराबाहेर पडते. घरातील दारिद्र्य - उपासमार हे कारण आहेच पण त्याही पेक्षा महत्वाचे कारण म्हणजे तिला बाहेरचं जग खुणावतं. जळजळीत वास्तवात जगणाऱ्या या मुलींना बाहेर पडून वेगळ्या जगात जगण्याची आस तयार होते आणि मागचा पुढचा कोणताही विचार न करता एवढ्याशा लहान वयात ती घरातून बाहेर पडते. स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी. खरं तिचं हे वय शिक्षण घेण्याचं पण तिला खुणावतात झगमगाट असलेली मोठी शहरे. दिल्ली, कलकत्ता, बेंगलोर, मुंबई, गोवा या अशा शहरांमध्ये ती कशी आणि कधी येउन पोहोचते ते तिच तिलाच कळत नाही. ती एकटीच नसते तिच्यासारख्या अनेकजणी याच पद्धतीने - याच मार्गाने आलेल्या असतात. हे उदाहरण आहे झारखंड - छत्तीसगढ आणि ओरिसा मधून पळून जाणाऱ्या मुलींचं. दिल्लीसारख्या शहरात या राज्यातील अनेक अल्पवयीन मुली घरा -घरांमधून दिसतात. घरकाम करण्यासाठी या मुलींना ठेवलं जातं. घरकामासाठी या मुली सहजपणे मिळाव्यात यासाठी दिल्लीमध्ये ब्युरो ऑफिसची भली मोठी बाजारपेठच आहे. हि बाजारपेठ आणि इथली ब्युरो ऑफिस बघितल्यावर आश्चर्य वाटल्या शिवाय राहणार नाही. भाजी -पाला विकत घ्यायला जावं तसं इथे या बाजारपेठेत मुलीना घरकामासाठी आणायला दिल्लीतील प्रतिष्ठित घरातील व्यक्ती येत असतात. . साधारणपणे सहा -सात वर्षांपूर्वी एका संशोधन प्रकल्पाच्या निमित्ताने या मुलीना भेटण्याची, त्यांच्या व्यथा जाणून घेण्याची संधी मिळाली. एक वर्षभर वारंवार झारखंड- छत्तीसगढ-ओरिसा या राज्यांमध्ये या संशोधन प्रकल्पासाठी प्रवास होत होता.एका आगळ्या-वेगळ्या व्यवस्थेची यामुळे ओळख झाली. या तीन राज्यांमधून अचानकपणे गायब होणाऱ्या मुलींचीं संख्या खूप मोठी आहे. वृत्तपत्रांमधून येणारी आकडेवारी कायम लक्ष वेधून घेत असते. शाळेत शिकणाऱ्या मुली अचानकपणे गायब होतात - हि मोठी आश्चर्याची आणि चिंतेची बाब आहे. या राज्यांमधून रोजगाराच्या शोधत अनेक पुरुष परराज्यांध्ये 'पलायन' करत असतात. गावच्या गावं ओस पडलेली दिसतात. पण गेल्या पंचवीस तीस वर्षात या भागातील मुलीदेखील 'पलायन' करू लागल्या आहेत. आपल्या छोट्याशा गावात राहण्यापेक्षा दिल्ली - मुंबई सारख्या मोठ्या शहरात मोलकरीण म्हणून काम करणं त्यांना जास्त आवडत. ना शिक्षण, ना समज असणारं वय अशा अवस्थेत त्या दिल्लीत येऊन पोहचतात आणि व्यवस्थेच्या बळी ठरतात. आपल्या देशात बालकामगार विरोधात कायदा आहे. पण दिल्ली सारख्या देशाची राजधानी असलेल्या शहरातच या कायद्याची उघडपणे पायमल्ली होताना दिसते. कायदे कोणासाठी आहेत? असा प्रश्न पडतो. बालकामगार ठेवणं हा गुन्हा असला तरी अनेक घरात घरकामासाठी या अल्पवयीन मुलीच हव्या असतात. घरातील एक कोपरा या मुलीना देतात. वर्षानुवर्षे एकाच घरात राहून काम करणाऱ्या अनेकजणी इथे सापडतात. घरकामासाठी एखादी महिला त्यांना नको असते. अगदी त्या घरातील मालकीण देखील महिला नको एखादी मुलगीच द्या अशी मागणी करत असते. घरकामासाठी चोवीसतास घरात राहणारी महिला नको असते. उद्या काही विपरीत घडायला नको, महिलेची जबाबदारी घेण्यापेक्षा लहान मुलगी ठेवली म्हणजे तिला धाक दाखवून ओरडून - प्रसंगी मारून तिच्याकडून काम करून घेता येतं असा या मालकिणींना वाटत असतं. जे एखाद्या महिलेच्या बाबत घडू शकत ते या छोट्या मुलीच्या बाबत घडणे थोडेच राहते. उलट लहान मुलीला घाबरवून धमकावून तिच्यावर वाट्टेल तसे अत्याचार होत असतात. त्या घरातील पुरुषही या मुलींचा गैरफायदा घेतात. अगदी सरसकट सगळीकडे हेच चित्र आहे असं म्हणता येणार नाही पण जी उदाहरणं आत्तापर्यंत समोर आली आहेत त्यामुळे याची दुसरी बाजू उघड झाली आहे. ब्युरो ऑफिसकडून फसवणूक या तीन राज्यांमधून मुलींना दिल्लीला आणण्यासाठी ब्युरो ऑफिसने त्या त्या भागात खास एजंट नेमले आहेत. मुलींना फूस लावून दिल्लीला घेऊन यायचं काम हे एजंट करतात. त्याचा मोबदला म्हणून त्यांना प्रत्येक मुलीमागे काही कमिशन मिळत असतं. याशिवाय गावातून आधी दिल्लीला गेलेली एखादी मुलगी देखील एजंटचे काम करते. ती गावातील आपल्या मैत्रीणीना प्रलोभनं दाखवून दिल्लीला घेऊन जाते तिलाही त्याबद्दल कमिशन मिळतं. ज्या प्रमाणे लग्न जुळवणाऱ्या संस्थामध्ये वधू-वराची फोटो सहित माहिती दिलेली असते त्याच पद्धतीने हि ब्युरो ऑफिसेस या मुलींच्या फोटोसहित माहितीचा अल्बम तयार करतात. तिथे येणाऱ्या प्रत्येकाला हा अल्बम दाखवला जातो. मुलीचा फोटो-माहिती बघूनच मुलगी घरी कामासाठी घेऊन जातात. ब्युरो ऑफिसवाले यातून रग्गड पैसे कमवतात. प्रत्येक मुलीमागे त्यांना दोन-तीन महिन्यांचा पगार मिळत असतो. काही ब्युरोवाले मुलींच्या हातात पगार पडू देत नाहीत. त्या घरमालकीणीला मुलीचा पगार ब्युरो ऑफिस मध्ये जमा करायला लावतात. मुलगी कधी सुट्टीसाठी घरी जाणार असेल तर तिला पैसे मिळतात. यामुळे त्यामुलीला माहितच नसतं कि आपल्याला नेमका पगार किती मिळतो? एकप्रकारे तिची फसवणूक होत असते. एक मोठ्ठ राकेट पद्धतशीरपणे कार्यरत आहे. यामध्ये बहुसंख्य मुली आपल्या पालकांना न सांगताच पळून जातात. तर काही प्रमाणात पालकच आपल्या मुलीना पाठवतात. घरात चूल पेटण्याचा प्रश्न असतो. खरा प्रश्न हा आहे कि या मुलींचं भवितव्य काय? मुलींचं भवितव्य अधांतरी शिक्षण अर्धवट सोडून दिल्यामुळे नीट लिहिता - वाचता येतं नाही, व्यवहार ज्ञान नाही. दिल्लीसारख्या ठिकाणी आल्यावर कोणावर विश्वास ठेवावा आणि ठेवू नये हे समजत नाही. यातून बऱ्याच जणींची वेगवेगळ्या मार्गाने फसवणूक होत असते. वर्षातून काही दिवस सुट्टी घेऊन या मुली घरी येतात ती वेळ गाठून यातील काही मुलींना त्यांच्या गावी -त्यांच्या घरी गाठलं होतं. काही मुली शहरातल्या वातावरणात राहायला सरावल्या आहेत असं जाणवलं. दिल्लीतील मोठमोठ्या बंगल्यात राहून आल्यावर गावात वीज - पाणीची सोय नसलेल्या घरात राहणे त्यांना आवडत नाही. मुलगी पैसे कमवून आणते म्हणून तिला घरात एकप्रकारचा मान हि असतो. पण तो जो वर पैसे मिळतात तो वरच असतो. गावात या मुलीना 'दिल्ली रिटर्न' असं म्हणून हेटाळलं जातं. साधारणपणे वयाच्या बाराव्या ते तेराव्या वर्षापासून ते पस्तीशी-चाळीशी पर्यंत दिल्लीमध्ये काम मिळतं. पस्तीशी नंतरच्या महिलांना इथे काम मिळत नाही. चाळीशी नंतर येणारी आजारपणं, त्यासाठी करावे लागणारे औषधपाणी नको असते. म्हणजेच त्या महिलेवर कोणताही खर्च करायची मानसिकता नसते. जवळ-जवळ पस्तीशी नंतर या सर्वजणींना आपल्या गावी परतण्या वाचून पर्याय नसतो. एक तर या दिल्ली मध्ये राहून काम करतात म्हणून यांच्याशी लग्न करायला कोणीही तयार नसतं आणि पस्तीशी नंतर गावी परतल्यावर लग्नाचं वयही राहत नाही. इथल्या अनेक गावांमध्ये अशा अनेक अविवाहित महिला आढळून येतात. आयुष्यातील महत्वाची वर्ष अति श्रम करण्यात जातात आणि जेव्हा स्वतः साठी म्हणून जगायची वेळ येते तेव्हा मात्र त्यांचा बरोबर कोणी नसतं. कमवत नाही म्हणून घरातील अन्य व्यक्ती हि पाठ फिरवतात. हि या मुलींची शोकांतिका आहे. आपली समाजव्यवस्था एकप्रकारे या परिस्थितीला कारणीभूत आहे. बालकामगार विरोधी कायदा असून हि अनेक घरात अल्पवयीन मुलींना कामाला ठेवलं जातं. याच वयातील मुली पाहिजे असा आग्रह धरला जातो आणि याच मागणीमुळे आज झारखंड -छत्तीसगढ आणि ओरिसा सारख्या राज्यांमधून दररोज असंख्य मुलींना फसवून आणलं जातं. जेव्हा हि आपल्या सारख्या सुसंस्कृत घरातून मागणी होणार नाही तेव्हा आपोआप हा गैर व्यवहार थांबेल आणि मुली देखील एक सुखी जीवन जगू शकतील. गरज आहे त्यांचं किमान दहावी पर्यंतच शिक्षण पूर्ण करून देण्याची, त्यांना त्यांच्याच राज्यात रोजगार मिळवून देण्याची. हि मागणी आत्ता तरी फक्त घरकामगार म्हणून असली तरी उद्या समजा हीच मागणी देहविक्रय करण्याकडे वळली तर या मुली कोणत्या मार्गाला आणि कोणत्या जगात असतील याची कल्पना करवत नाही. म्हणूनच या व्यवहाराला वेळीच लगाम घातला गेला पाहिजे. कायद्याचा आधार घेऊन कडक कारवाई झाली पाहिजे हीच तळमळीची इच्छा !

'ती' चं जग...

कधी अचानकपणे कोणी तरी आपल्याला शिकवून जातं. न विसरता येणारं. अशी माणसं आपल्याला कायम भेटली पाहिजेत असं मला वाटतं . या वेळेस मात्र मला एक बारा- तेरा वर्षाची मुलगी शिकवून गेली. तिचं बोलणं आजही आठवतंय. आजच्या पिढीला नावं ठेवणारे अनेक आपल्या आजूबाजूला दिसतात. पण नावं ठेवण्याइतके सगळेचजण बिघडलेत अशी परिस्थिती नाहीये. या पिढीतही चांगल्या - वाईटाची जाणीव असलेले काहीजण आहेत. त्यातलंच हे उदाहरण. गोव्यात लोखंडाच्या खाणी असलेल्या गावांमध्ये 'सेंटर फॉर डेव्हलपमेंट प्लानिंग अन्ड रिसर्च' या संस्थेच्या माध्यमातून तिथल्या ग्रामस्थांसाठी, महिलांसाठी आणि शालेय विद्यार्थी- किशोरवयीन मुलींसाठी विविध प्रकल्प राबवले जातात. यातील किशोरवयीन मुलींच्या गटप्रमुख मुलींचा अभ्यासवर्ग होता. साधारणपणे दहा -बारा वर्षाच्या मुलींपासून ते पंधरा -सोळा वर्षाच्या मुलींचे गट तिथल्या गावांमध्ये आमच्या समन्वयकांनी तयार करून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे प्रशिक्षण, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, आरोगयाची काळजी असे अनेक कार्यक्रम घेतले जातात. या अशाच गटातील त्याच वयोगटातील गटप्रमुख मुलींचा हा अभ्यास वर्ग होता. त्यातील एक सत्र या गटप्रमुख मुलींना येणाऱ्या अडचणींवर होतं. सुरुवातीला कोणीच बोलायला तयार नव्हतं. एक एक करून हळूहळू काहीजणी बोलायल्या लागल्या. त्यात एक बारा -तेरा वर्षाची मुलगी होती. तिच्या बोलण्यात आत्मविश्वास जाणवत होता. तिने आधी बाकीच्या मुली काय बोलतायत हे ऐकलं आणि मग सर्वात शेवटी आपलं म्हणणं मांडल. बोलायला सुरुवात करताना पहिल्यांदा तिने आम्हालाच प्रश्न, ' किशोरी विकास प्रकल्प' फक्त मुलींसाठीच का?.... मान्य आहे कि आमचा विकास व्हावा, गावातल्या आम्ही सगळ्याजणींनी एकत्र येउन काही चांगले उपक्रम करावेत हा उद्देश आहे आणि आम्हाला याचा खूप उपयोगही होतोय. पण हा फक्त आमच्यासाठी नको. तो मुलांसाठीही असला पाहिजे.' आम्हाला अपेक्षित नव्हतं कि यांच्यातलीच कोणी चिमुरडी असं काही बोलू शकेल. तिचा मुद्दा विचार करायला लावणारा होता. मुलगी वयात आली कि घरी - दारी सगळेजण तिला तिने कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, तिने स्वतःला कसं जपलं पाहिजे इ . इ सांगत असतात. अनेकांचा तिच्यावर पहारा असतो. ती कुठे जाते- येते, तिचे मित्र-मैत्रीणी कोण आहेत.... याकडे लक्ष दिले जाते. हेच मुलगा वयात आल्यावर होतं का? मुलगी वयात आल्यावर तिच्यामध्ये आणि आई मध्ये नकळतपणे एक मैत्रीचं, एकमेकींची काळजी घेणारं नातं तयार होतं. पण मुलगा वयात आला कि तसं घडत का? कित्ती आया आपल्या वयात आलेल्या मुलांना समजावून सांगतात. किती वडील आपल्या वयात आलेल्या मुलाला त्याने कसे वागले पाहिजे विशेषतः मैत्रिणींशी..हे सांगतात? मुलींना मात्र मित्रांशी वागताना एक विशिष्ट अंतर ठेवून वागलं पाहिजे अस सांगितलं जातं. भविष्यात येऊ शकणाऱ्या समस्यांची जाणीव करून दिली जाते. इथे मुलींनाच का? आणि मुलांना का नाही.. हा प्रश्न नाहीये. इथे जडण -घडण कोणाची कशी होतेय हे सांगण्याचा प्रयत्न आहे. आज आजूबाजूला घडणाऱ्या घटना बघितल्या कि मुला - मुलीना वाढवताना होणारा भेद प्रकर्षाने जाणवतो आणि कदाचित त्यातूनच आज ज्या समस्यांचा भडका उडलेला दिसतोय. मुलीं इतकीच मुलांचीही जबाबदारीने वागायची गरज आहे. मागे काही वर्षान पूर्वी पुण्यातील बस प्रवासात महिलांचा होणारा लैंगिक छळ या विषयावर भरपूर महिलांशी - मुलींशी बोलत होते. सवयीप्रमाणे घरात त्यावर आम्हा सर्वांची चर्चा व्हायची. पण त्या वेळेस पहिल्यांदा असं वाटला कि आपण बायकांशी बोलतोय तर पुरुषांशीही बोललं पाहिजे त्याची सुरुवात घरातूनच केली. माझ्या पाठच्या दोन भावंडांपासून. ते बस प्रवासात कसे वागतात? एखादी महिला शेजारी बसली असेल तर त्यांचा वर्तन कसं असतं अशा अनेक प्रश्नांवर त्यांच्याशी बोलले होते. या पद्धतीचा बोलणं हि आवश्यक असतं हे त्यांच्याशी बोलल्यावर जाणवलं. ज्या पद्धतीने आमची चर्चा झाली त्यानंतर महिलांनाही बस मध्ये आरक्षण दिले पाहिजे याबाबत माझ्या भावंडांचही सकारात्मक मत तयार झालं. मिटिंग मध्ये बोलून गेलेल्या त्या चिमुरडीचं म्हणणंही हेच होतं कि आमच्या इतकीच आता मुलांनाही बरे -वाईट काय आहे हे सांगण्याची सध्या गरज आहे. तो कसा हि वागला तरी काय फरक नाही पडणार. फरक पडायला तो थोडाच मुलगी आहे.. असा विचार करून आपण आपल्या मुलाचं भविष्य बिघडवून ठेवतोय. या आशाच विचारांमुळे मुलांमध्ये टोकाची कृती करण्याची वृत्ती वाढली आहे. १८ वर्षाच्या आतील वयाचा मुलगा २३ वर्षाच्या मुलीवर अतिशय पाशवी पद्धतीने बलत्कार करतो आणि आपल्या अन्य मित्रांनाही तिच्यावर बलात्कार करायला चिथावणी देतो हि कसली लक्षणं आहेत? हे कसलं धाडस आहे. आजच्या पिढीत रुजू पाहणाऱ्या पौरुषत्वच्या विचित्र कल्पना वेळीच बदलायला हव्यात. खरच मुलांसाठीही किशोर विकास प्रकल्प हि काळाची गरज आहे. दिल्लीतील बलात्काराच्या घटनेनंतर अनेकांनी अनेक वक्तव्य केली. काहींनी मुलीनांच सल्ले दिले. त्यातील काही सल्ले तर अतिशय विचित्र होते. जवळ एखादं हत्यार बाळगावं, कोणी त्रास देऊ लागलं तर त्या वेळी हे उपयोगी पडेल. मिरची पूड, पिपर स्प्रे जवळ बाळगावा. त्रास देणाऱ्याला मारा पण जीवे मारू नका. जखमी करा असले काही जणांनी सल्ले दिले. म्हणजे स्वतःचं संरक्षण स्वतःच करा. आम्ही काही करू शकत नाही. आणि परत हे सगळे सल्ले फक्त मुलीनांच. गुन्हा करणारा कोणी दुसराच पण त्याची शिक्षा कोणा दुसऱ्याला. अजब मानसिकता आहे आपल्या समाजाची. या समस्यांचं मूळ आपल्या घरात आहे. आपली मानसिकता बदलण्यापासून. घरातील मुलगी -मुलगा यांना समान पातळीवर वाढवण्याची. दोघानांही आपापल्या जबाबदारींची जाणीव करून देण्याची. मध्यंतरी एक मैत्रीण भेटली. ती तिच्या मुलाबद्दल बोलत होती. ' मुलगी असती तर बरं झालं असतं! मुलाला वाढवणं अवघड होऊन बसलंय. समाजात वावरताना त्याने एक चांगली व्यक्ती म्हणून वावरल पाहिजे. माणूसपण जपलं पाहिजे. एवढीच अपेक्षा आहे त्याच्याकडून…' असं ती बोलून गेली. तिच्या बोलण्यात एक प्रकारची काळजी, तळमळ जाणवत होती जी सहसा मुलग्यांच्या आयांमध्ये दिसत नाही. मुलगी म्हणजे संपूर्ण घराची अब्रू त्यामुळे मुलगी म्हणजे जोखीम अशी काहीशी विचारसरणी बाळगणारे उजळ माथ्याने समाजात वावरतात. पण हीच जोखीम मुलाच्याबाबत असू शकत नाही का? हे कसं विसरतात. एका छोट्या मुलीने आम्हा सर्वांची विचार करण्याची पद्धत बदलवली. ती स्वतः जे अनुभवत आहे तेच तिच्या बोलण्यात व्यक्त झालं. पण तिच्यामुळे आमची काम करण्याची पद्धतही आम्हाला बदलावी लागली. अशा अनेक मुली आपल्या आजुबाजूला आहेत त्यांना प्रोत्साहन देऊन पुढे आणलं पहिजे.