मनस्विनी
Monday, April 6, 2015
गोव्याची विविधता
रोजची अस्वस्थता आणि हतबलता
Wednesday, March 11, 2015
परिवर्तनाच्या वाटसरू...
स्त्री ही तिच्या कुटुंबाचा कणा असते. कुटुंबाला एकत्रित बांधण्याची क्षमता तिच्यामध्ये असते. असं म्हणतात की महिलांच्या अर्थिक-सामाजिक परिस्थितीकडे बघितले असता तुम्हाला त्या देशाची संस्कृती समजू शकते. हे झाले अभ्यासकांचे निकष, परंतु महिला आज पुरुषांच्या बरोबरीने अर्धे आकाश पेलताना दिसत आहेत हेही सत्य नाकारता येणार नाही. मन बधीर करणार्या घटना आजूबाजूला घडत असताना सकारात्मक विचार जपणार्या आणि हेच सकारात्मक विचारांचे बीज सर्वत्र पसरवणार्या अनेकजणी आहेत. महिलांचा जीवनस्तर उंचवावा यासाठी अनेक पातळींवर विविध प्रयोग सुरू आहेत, ज्यामध्ये महिलांचा सहभाग हा खूप महत्त्वाचा मनाला जातो.महिला सबलीकरण आणि महिला सक्षमीकरण असे शब्द अजून जिथे पोहोचले नाहीत त्या गावपातळीवर महिलांचे जीवन अधिक कष्टमय वाटते. पण याही परिस्थितीत त्या आपल्या कुटुंबाचे जीवनमान उंचावण्यासाठी धडपड करतात हेही कौतुकास्पद आहे. आपल्या ग्रामीण भागात डोकावले असता ‘महिला मंडळ’ आणि ‘बचत गटांनी’ या महिलांमध्ये एक छान जाळे विणलेले दिसते. अगदी काही वर्षांपूर्वी बचत गटाच्या बैठकांना महिला उघडपणे जात नव्हत्या. घरातले दडपण, कोण काय म्हणेल याची भीती असायची. परिवर्तन हे हळूहळू आणि कृतीमध्ये, विचारांमध्ये सातत्य ठेवल्याने होते हेच खरे. महिलांमधील चिकाटी आणि उमेद या दोन गोष्टींमुळे आज त्या आर्थिक परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झाल्या आहेत.
‘मायक्रो ङ्गायनान्स’ची दोरी महिलांच्या हाती
प्रत्येक महिला आपल्यापरीने बचत करत असते. पण या बचतीला एक नियमित स्वरूप मिळावे यासाठी महिला अगदी अनौपचारिक पद्धतीने एकत्र येऊ लागल्या आणि एकत्र येऊन बचत करू लागल्या, ज्याला ‘भिशी’ असेही म्हणले गेले. याच भिशीने पुढे ‘मायक्रो ङ्गायनान्स’ म्हणजेच बचतगटांनी जागा घेतली. यात ङ्गायदा एक झाला की सगळ्या आर्थिक व्यवहाराची नोंद ठेवली जाऊ लागली आणि बचतगट बँकेशी लिंक केल्यामुळे बँकेकडून गटातील महिलांना कर्जही मिळू लागले, जे आजवर कधी मिळत नव्हते. पूर्वीही महिला एकत्र येऊन बचत करायच्या. अडीअडचणीच्या प्रसंगी कायम गावातल्या सावकाराकडे जायच्या. सावकार त्यांच्याकडून बेहिशेबी व्याज घ्यायचा. पण बचतगट बँकेशी लिंक झाल्यामुळे सावकारी अगदी मोडून पडली. बँकेच्या व्यवहारात महिलांचा सहभाग वाढला. पोलिस स्टेशन आणि बँक ही दोन अशी ठिकाणे आहेत जिथे ग्रामीण भागातील महिला जायला आजही घाबरतात. परंतु बचतगटांमुळे त्यांची ही भीड चेपली गेली.
आजच्या घडीला भारतात ३० लाखांहून अधिक बचतगट अस्तित्वात आहेत. प्रत्येक गटात साधारणपणे २० महिला पकडल्या तरी लक्षात येईल की महिलांचा केवढा मोठा सहभाग या सगळ्या उपक्रमात आहे, आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे या प्रत्येक महिलेची साधारणपणे १०० रुपये याप्रमाणे बचत पकडली तर ३० लाख बचतगट किती मोठ्या रक्कमेची उलाढाल करत आहेत आणि देशातील एका मोठ्या आर्थिक घडामोडीमध्ये महिलांचा केवढा मोठा हातभार आहे हेही लक्षात येते. महिलांची हीच क्षमता बघून आज अनेक बँका स्वतःहून ग्रामीण भागातील महिलांकडे जात आहेत. या ग्रामीण भागातील महिलांची ताकद बँकांना समजली आहे. महिला आर्थिक उलाढालीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात हे त्यांनी ओळखल्यामुळे आज बँका ग्रामीण भागातील महिलांच्या दरी जाऊ लागल्या आहेत. त्यांच्यासाठी विविध योजना तयार करू लागल्या आहेत.
महिलांच्या हाती रोजगारनिर्मिती
देशभरात महिलांचे बचतगटाच्या माध्यमातून जे जाळे निर्माण झाले आहे त्यातून काही चांगले प्रकल्प उभे राहिले. स्वतः रोजंदारीवर कुठेतरी मजुरी करायला जाणार्या महिला आज अनेक महिलांसाठी रोजगार निर्माण करणार्या बनल्या आहेत. आंध्र, कर्नाटकमधील बचतगट आणि त्यातून उभे राहिलेले प्रकल्प बघायला गेलो असता अशी अनेक उदाहरणे बघायली मिळाली जिथे महिला आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत आणि अन्य महिलांनादेखील आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्यासाठी साहाय्य करत आहेत. एका बचतगटाने ‘सॅनेटरी नापकिन’ बनवण्याचा उद्योग सुरू केला. थोड्याच दिवसांत त्याची मागणी वाढली. गावातील अन्य बचतगटांतील महिलांना या कामात सामावून घ्यावं लागलं. या सर्व महिला शेतात नाही तर जिथे काम मिळेल तिथे रोजंदारीवर काम करायला जायच्या. पण आज त्यांचा स्वतःचा उद्योग उभा राहिला आहे. सगळ्याजणी एकत्र येऊन काम करू लागलो म्हणून झालं, नाहीतर हे होऊ शकलं नसतं, अशी प्रांजळ कबुलीदेखील त्या देतात.
बचतगटाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास
बचतगटांमुळे महिला एकत्र आल्या, बचत करू लागल्या, आर्थिक विकास होऊ लागला, पण याबरोबरीने त्यांना सर्वांगीण विकासाची संधी मिळाली. लहानपणी आपण कायम ‘एकीचे बळ मिळते ङ्गळ’ अशी म्हण ऐकत आलोय, पण बचतगटांच्या माध्यमातून एकत्र येऊन मिळालेले आर्थिक विकासाचे ङ्गळ आणि त्याची गोडी महिलांना आवडली आहे. एकत्र येऊन बचत करणे हाच ङ्गक्त उद्देश आता उरला नाही. आपल्या कुटुंबाच्या चौकटीबाहेर पडून महिला आता आपल्या गावाच्या विकासाचा विचार करताना दिसतात. विकासकामांमध्ये आपला सहभाग दाखवतात. ग्रामसभांना जाऊन एखादा निर्णय पटला नाही तर त्या विरोध दर्शवतात. आरोग्य शिबीर, व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षण, आपल्या गटासाठी व्यवसाय मार्गदर्शन यांसारख्या उपक्रमांचे आयोजन करतात, ज्यांमधून आपला स्वतःचा आणि आपल्या गटातील महिलांचा विकास होईल, अशा उपक्रमांमध्ये त्यांचा हिरिरीने सहभाग असतो. त्यांचा उत्साह अनेक वेळा थक्क करणारा असतो.
बचतगट आणि महिला यांचे सामर्थ्य ओळखून या उपक्रमाला एक नित शिस्त आणि एक चांगले वळण लावून देण्याचे काम आंध्र, गुजरात, महाराष्ट्र यांसारख्या राज्यांनी केले. बचतगटांना शासनाकडून मिळणारे प्रशिक्षण, प्रशिक्षणानंतर या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देणे, त्यांना प्रसिद्धी मिळवून देणे यासारखे उपक्रम त्या त्या राज्यांतील शासनयंत्रणेमधून झाले. पुणे जिल्ह्यातील बचतगटातील महिलांनी बनवलेल्या विविध उत्पादनांना बाजारपेठ मिळून देण्यासाठी ‘सावित्री’ नावाने पुण्यात एक शॉपिंग सेंटर काही वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले. तेव्हा पुण्यात ‘मॉल्स’ हा प्रकारदेखील नव्हता. नंतर हा उपक्रम ङ्गक्त पुण्यापुरता न उरता अख्ख्या महाराष्ट्रातील बचतगत आणि त्यांची उत्पादने याला जोडण्यात आली. आज बचतगटांनी बनवलेल्या वस्तूंना ‘सावित्री’सारखे ब्रँडनेम मिळालेय. त्यांना बाजारपेठ मिळालीय. असे काम गोवा शासनाने गोव्यातील बचतगटांतील महिलांसाठी केले पाहिजे. गोव्यातील बचतगटांना त्यांची स्वतःची ओळख निर्माण करून देण्याची संधी मिळाली पाहिजे. ज्या पद्धतीने बँका या महिलांच्या पाठीशी उभ्या राहिल्या, त्याप्रमाणे शासनाने गुजरात आणि महाराष्ट्र शासनाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून या महिलांनी बनवलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून द्यायला हवी.
असाही एक अभिनव प्रयोग
नेत्रावळी हे निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती भरपूर असलेल्या या गावात गेली अनेक वर्षे महिला बचतगट तसे अस्तित्वात होते, परंतु ते चर्चेत तेव्हा आले जेव्हा शासनाने हे गाव ‘आदर्श ग्राम’ म्हणून दत्तक घेतले. या निमित्ताने नेत्रावळीतील बचतगटातील महिला एकत्र आल्या. मुळात गावच इतक्या दुर्गम भागात दूरवर असल्यामुळे बारीकसारीक गोष्टींसाठी सांगे- केपे या गावांवर अवलंबून राहावे लागते. इथे शेती आणि कुळागरात मजुरीचे काम एवढेच महिलांसाठी उत्पन्नाचे साधन आणि यामध्ये मिळून मिळून किती रोजगार मिळणार. महिलांमध्ये काहीतरी करण्याची उमेद होती, पण त्यांना प्रोत्साहन देणारे आतापर्यंत कोणी नव्हते. ‘सेंटर ङ्गॉर डेव्हलपमेंट प्लानिंग अंड रिसर्च’ (सी.डी.पी.आर.) या संस्थेच्या माध्यमातून या गावातील महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध झाली.
इथल्या महिला खूप कष्टाळू. पडेल ते काम करणार्या आणि प्रयोगशील. त्यांच्यातील हाच उत्साह हेरून सी.डी.पी.आर. संस्थेने या महिलांमध्ये कामास सुरुवात केली. मायनिंग सुरू असताना सेसा स्टरलाईट (त्यावेळची सेसा गोवा) या कंपनीच्या आर्थिक साहाय्याने या भागातील महिलांसाठी केटरिंग आणि शिवणकामाचे प्रशिक्षण देण्यात आले. अशा पद्धतीचे प्रशिक्षण पहिल्यांदाच या गावात झाले. या पद्धतीची संधी त्यांच्यापर्यंत कधीच चालून आली नव्हती. नेत्रावळी खूप लांब आहे अशी सबब सांगून अनेकजण इथे यायचे टाळतात असा इथल्या महिलांचा अनुभव. पण प्रत्यक्ष आपल्या गावातच आपल्याला प्रशिक्षणाची संधी मिळतेय म्हटल्यावर महिलांनीदेखील उत्स्फूर्त प्रतिसाद या प्रशिक्षण कार्यक्रमांना दिला. चतुर्थीच्या काळात भरणार्या माटोळीच्या बाजाराने नेत्रावळीतील महिलांना आर्थिक स्वावलंबी होण्याची संधी तर मिळालीच, पण त्यांच्या या उपक्रमाला भरपूर प्रसिद्धीही मिळाली. सी.डी.पी.आर. संस्था आणि शासनाच्या ‘प्लानिंग आणि स्टेटस्टीक’ विभागाच्या सहकार्याने या गावातील बचतगटातील सर्व महिलांची ‘नेत्रावळी महिला उद्योग समूह’ या नावाने संस्था स्थापन करून देण्यात आली. नेत्रावळीतील महिलांनी जंगलातून गोळा करून आणलेल्या, माटोळीसाठी लागणार्या दुर्मीळ अशा वनस्पती, ङ्गळं, फुलं यांची विक्री करणारा बाजार मडगावमध्ये भरवण्यास सुरुवात केली. नेत्रावळीमधील महिलांना यामुळे गावातून बाहेर पडून एक वेगळं जग बघायची संधी मिळाली. यातील काही महिलांना मडगावदेखील माहीत नव्हतं. यातील काही महिला या घरांमधून रोजगारासाठी अशा कधी बाहेर गेल्या नव्हत्या. त्यांच्यासाठी हा वेगळाच अनुभव होता. गेली दोन वर्ष हा बाजार भरवला जातो. महिलांनी अपेक्षा केली नव्हती इतका हा बाजार यशस्वी झाला. दुसर्या वर्षी या माटोळी बाजाराच्या नियोजनाच्या टप्प्यावरच महिलांमध्ये आत्मविश्वास वाढलेला दिसून येत होता.
नेत्रावळीमधील महिलांना माटोळी बाजाराच्या निमित्ताने एक वेगळं व्यासपीठ मिळालं होतं. ज्यांच्या हातात स्वतः कमावलेले पैसे कधी पडले नव्हते, त्यांच्या हातात या बाजारामुळे बर्यापैकी चांगली रक्कम आणि तीदेखील चतुर्थीच्या आधी मिळाल्यामुळे महिला खूश झाल्या. आता मात्र महिलांमध्ये काहीतरी करण्याची उमेद निर्माण झाली. यांतील काही महिलांनी गावात ज्या वस्तू मिळत नाहीत आणि त्यासाठी सांगे- केपेला जावे लागते अशा वस्तूंचे एक दुकान सुरू केले. वेगवेगळ्या बचतगटांतील महिलांनी एकत्र येऊन या दुकानाची सुरुवात केली. या मल्टीपर्पज दुकानाचे उद्घाटन गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले. नेत्रावळीतील महिलांच्या उपक्रमांना मनोहर पर्रीकर यांचे कायम मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले आहे.
नेत्रावळीत स्ट्रोबेरी शेती
नेत्रावळी पंचायतीमधील अतिशय दुर्गम अशा भागात वेर्ले नावाचे गाव आहे. या गावातील बचतगटातील महिला आणि हे वेर्ले गाव मध्यंतरी चर्चेचा विषय बनले ते इथे महिलांनी केलेल्या स्ट्रोबेरीच्या शेतीमुळे. गोव्यात पण स्ट्रोबेरीची शेती होऊ शकते हे या महिलांच्या प्रयत्नांनी सिद्ध झाले. यासाठी या गावातील काही महिला महाबळेश्वरला जाऊन रीतसर प्रशिक्षण घेऊन आल्या. स्ट्रोबेरीच्या शेतीसाठी लागणारी थंड हवा, तसं वातावरण वेर्ले गावात असल्यामुळे हा अभिनव असा स्ट्रोबेरी शेतीचा प्रयोग एकदम यशस्वी झाला. ‘मिनिरल ङ्गौंडेशन’च्या सहकार्याने हा सगळा उपक्रम राबविण्यात आला. आता दरवर्षी इथल्या महिला स्ट्रोबेरीची शेती करू लागल्या आहेत. उत्पन्नाच्या साधनात नवी भर पडली आहे. याबरोबर वेर्ले येथील निसर्गरम्य वातावरण अनुभवण्यासाठी येणार्या पर्यटकांना इथे मुक्काम करता यावा या उद्देशाने ‘आंगण’ नावाने इथल्याच कुटुंबांमध्ये मुक्कामाची, जेवणाची सोय करून देऊन महिलांना आणखी एक उत्पन्नाचे साधन प्राप्त झाले आहे.
सेंद्रीय भाजीपाला लागवड
नेत्रावळी पंचायतीमधील नुने आणि सावरी भागातील महिलांचा समूह वर्षानुवर्षे सेंद्रीय पद्धतीने भाजीपाला करतो. सावरी भागातील महिलांनी गेल्या वर्षी काही टन मिरचीचे उत्पादन घेतले, तर नुनेमधील महिलांनी चिटकी-मिटकी, तांबडी भाजी पिकवली. हे प्रयत्न बघून अग्रीकल्चर डिपार्टमेंटने या महिलांना प्रशिक्षण, भाजीपाल्याची बी-बियाणी, खतं देण्यास सुरुवात केली आहे. इथल्या महिला कष्टाळू तर आहेतच पण प्रयोगशीलदेखील आहेत. त्यांना ङ्गक्त प्रोत्साहन आणि मार्गदर्शनाची गरज आहे.
Sunday, December 1, 2013
फेस्टिव्हलवर प्रभाव दिग्दर्शिकांचा!
अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली आणि तरुण तेजपालची बातमी आगीसारखी सगळीकडे पसरली. इफ्फीच्या मिडिया सेंटरमध्ये महोत्सवासाठी देशभरातून आलेल्या पत्रकारांना आयती बातमी मिळाली. एकीकडे तरुण तेजपाल प्रकरणातील ताज्या घडामोडी कानावर पडत होत्या तर दुसरीकडे इफ्फीविविध सिनेमांमधून अत्याचार- बलात्कार सारख्या घटनांवर आवाज उठवणाऱ्या नायिका दिसत होत्या. एकीकडे भासमान जगातील चित्र तर दुसरीकडे जळजळीत वास्तव विचार करायला भाग पडत होतं. जणूकाही आजूबाजूला घटणाऱ्या घटनांचेच पडसाद पडद्यावर बघायला मिळत होते. जे फक्त सिनेमा बघायला आणि त्याचा आस्वाद घ्यायला आले होते ते आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे दुर्लक्ष करू शकत होते. एकूण काय तर इफ्फीचे सुरुवातीचे दिवस तरुण तेजपालने गाजवले.
दर वर्षी महोत्सवाचा एक वेगळा चेहरा त्यात दाखवल्या जाणारया चित्रपटांमधून दिसून येत असतो. यावर्षी महोत्सवाचा कॅटलॉग हातात पडताच हा चेहरा स्पष्टपणे स्पष्टपणे दिसून आला. महायुद्धाची पार्श्वभूमी, महिला केंद्रित चित्रपट यावर आधारित चित्रपट यावर्षीच्या महोत्सवाचा चेहरा होते. ७४ देशांमधले दाखवण्यात आलेल्या ३७४ चित्रपटांमध्ये बहुसंख्य चित्रपट महायुद्धाची पार्श्वभूमी आणि महिला केंद्रित विषय हाताळल्याचे ठळकपणे दिसत होते. 'जागतिक सत्य' म्हणावे असे हे सूत्र वेगवेगळ्या देशांमधील, भाषांमधील चित्रपटांमधून बघायला मिळाले.
युद्ध -महायुद्धाची पार्श्वभूमी आणि नाते संबंध
जर्मनी - ज्यू संबंध, छोट्या छोट्या देशांना पोहोचलेली झळ, इराक - इराण-अमेरिका संबंधाची पार्श्वभूमी, युद्धजन्य परिस्थिती आणि अशा परिस्थितीत जगणारी माणसं, लैंगिक शोषण, अत्याचार, बलात्कार यांना सामोरं जाताना जगण्याची धडपड करणाऱ्या महिला आणि मुलं या साऱ्यांचे चित्रण 'इन हायडिंग', 'युरोपा युरोपा', 'लास्ट ऑफ अनजस्ट', 'द जर्मन डॉक्टर', 'अ पीस इन हेवन', 'विव्हा बेलारूस' या चित्रपटांमधून बघायला मिळाले. जर्मनीच्या अत्याचारापासून स्वतःला बचावू न शकलेला पोलंड सारखा छोटासा देश. या देशातून दोन चित्रपटांना प्रवेश मिळाला आणि दोन्ही चित्रपट महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित होते. दिग्दर्शक यान किडावा ब्लोन्स्की यांनी ' इन हायडिंग' या सिनेमात नझी अत्याचार, ज्यू नां करावे लागलेले पलायन त्यातून भेटलेली नव नवीन माणसं, तयार झालेली नवीन नाती याचं अप्रतिम चित्रण या सिनेमा मध्ये केले आहे. युद्धाची पार्श्वभूमी असताना मानवी नाते संबंध रंगवण्याची कसब या दिग्दर्शकाने मोठ्या खुबीने सांभाळली आहे. 'विव्हा बेलारूस' हा ही पोलंडचा युद्धाचीच पार्श्वभूमी असलेला सिनेमा. रशियन सैनिकांनी सोव्हिएत मधील छोट्या छोट्या देशांवर केले हुकुमशाही पद्धतीचे अत्याचार, त्याचा प्रतिकार करणारे कलाकार - लेखक - पत्रकार मंडळी आणि त्यांना अज्ञातवासाची भोगावी लागलेली शिक्षा, त्यांच्या अभिव्यक्तीवर आलेली गदा, सक्तीने लष्करात भरती व्हावे लागणे या सगळ्या गोष्टी भारतातील आणीबाणीच्या काळाची आठवण करून देतात.
मार्गरेटा व्हान ट्रोटा या दिग्दर्शिकेने '' हानाह अरेंट' या तिच्या चित्रपटामधून दुसरे महायुद्ध, नाझींच्या कारवाया याचे वेगळेपाने चित्रण केले आहे. एक शिक्षिका जी पुढे पत्रकाराचा पेशा स्वीकारून नाझींच्या कारवायांवर नजर ठेवत असते. त्यांच्या छावण्यामध्ये जाऊन त्यांची सगळी रहस्य जगासमोर आणते. खूप नाट्यमयरित्या चित्रपटाची कथा पडद्यावर मांडण्यात दिग्दर्शिका यशस्वी झाली आहे. या चित्रपटाची दिग्दर्शिका मार्गरेटा व्हान ट्रोटा हि 'फेमिनीस्ट फ़्लिममेकर' म्हणून प्रसिद्ध आहे. तिच्या चित्रपटातील नायिका हि सामन्यातून असामन्य ठरून जाते. ते या चित्रपटातही जाणवते. हानाह सारखी सशक्त नायिका या चित्रपटात उभी करून युद्धात महिलांचा सहभाग वेगवेगळ्या पातळीवर कसा होता हे देखील दाखवून दिले आहे.
महिला प्रश्नांची कोंडी सोडवण्याचा प्रयत्न
इफ्फीमध्ये खूप सारे चित्रपट महिला प्रश्नांवर आधारित होते. विशेषतः इराण आणि अफगणीस्तान मधील चित्रपट हे तिथल्या महिलांची स्थिती मांडणारे होते. अफगणीस्तानचे दिग्दर्शक अतिक रहिमी यांच्या 'द पेशन्स स्टोन', इराणमधील दिग्दर्शिका पौरन देराखशान्देह चा ' हुश्श… गर्ल्स डोंट स्र्किम ' आणि मोरोक्को -फ्रांस मधील दिग्दर्शक मोहमद अहेद बेन्सुदा यांचा 'बिहाइंड क्लोज डोअर', अफगणीस्तानमधील सेदिक अबेदी यांचा ' अ मन डिझायर फॉर अ फिफ्थ वाईफ' या सिनेमांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. अफगणीस्तानचे दिग्दर्शक अतिक रहिमी यांच्या 'द पेशन्स स्टोन' या चित्रपटातील नायिका तालिबानी सैनिकांच्या कारवायांमध्ये कोमात गेलेला तिचा नवरा, घरातच त्याच्यावर करावे लागणारे उपचार यासारया परिस्थितीत त्याच्या जवळ व्यक्त होण्याची तिला मिळालेली संधी याचे अतिशय सुंदर चित्रण दिग्दर्शक रहिमी यांनी केले आहे. नवरयाशी कधीच मोकळेपणे वागायला मिळालेलं नसतं. नवऱ्याचा हवा तसा सहवास मिळालेला नसतो. त्याला कायम घाबरून राहण्यातच आयुष्य जात असतं अशा वेळेस तिचा होणारा कोंडमारा, मन मोकळं करण्याची तळमळ. याचे दर्शन या चित्रपटात बघायला मिळते. चित्रपटाची कथा खूप वेगळी ठरते. या कथेत दगडाला महत्व दिले आहे. आपल्याला आवडलेल्या एखाद्या मौल्यवान दगडाकडे तू आपलं मन मोकळं कर असा सल्ला देणारी नायिकेची आत्या आणि आत्याच्या सांगण्यावरून कोमात असलेल्या नवरारुपी ' दगडा' ला आयुष्यातील सर्व गुपितं सांगणारी नायिका या साऱ्याची सुरेख मांडणी दिग्दर्शकाने या चित्रपटात केली आहे आणि याला गोल्डशिफ्ट फरहानी या अभिनेत्रीच्या उत्तम अभिनयाची जोड मिळाल्यामुळे चित्रपत एकदम जमून गेलाय. इराणमधील दिग्दर्शिका पौरन देराखशान्देह चा ' हुश्श… गर्ल्स डोंट स्र्किम ' आणि मोरोक्को -फ्रांस मधील दिग्दर्शक मोहमद अहेद बेन्सुदा यांचा 'बिहाइंड क्लोज डोअर' या दोन्ही चित्रपटांमधून महिलांचे होणारे लैंगिक शोषण, अत्याचार दाखवण्यात आले आहे. महिलांच्या समस्यांमध्ये सर्वत्र समानता आहे जे चित्रण भारतातील सिनेमांमध्ये बघयला मिळते तेच इराण, अफगणीस्तान, फ्रांस, जपान अशा जगातील नकाशावर वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या देशांमध्ये बघायला मिळते
इफ्फीवर दिग्दर्शिकांचा प्रभाव
उक्रेनच्या व्हिक्टोरिया ट्रोफिमेंको, इराणमधील दिग्दर्शिका पौरन देराखशान्देह, भारतातील वीणा बक्षी, इटलीमधील इमा दांते, कानडाच्या लुईस अर्चमबोउल्त, फ्रांसच्या निकोल ग्रासिया, नेदरलंडच्या नानुक लिओपोल्ड, सर्बियाच्या जेलेना बाजिक जोसीस, फ्रांसच्या इव्हा पेर्वोलोविक, बेल्जियमच्या डेल्पीन लेहेरीसी, कानाडाच्या चोल रोबिचाउद, इनग्रिड विनेगर, फ्रांसच्या काटेल क़ुइलिवेर, अर्जेन्टिनाच्या लूइसा प्यूएझो, रशियाच्या अलेक्सझाड्रा स्ट्रेलयाना, चिलीच्या मार्सेला सैद, फिलिपिन्सच्या हानाह अस्पिया, जर्मनीच्या अना झोहरा बेर्राचेद, इंडोनेशियाच्या मौली सूर्या, जर्मनीच्या मार्गरेटा व्हान ट्रोटा, डेन्मार्कच्या सुसान बीर, फ्रांसच्या क्लाअर डेनिस, पोलंडच्या मल्गोर्झाता स्झूमोवस्का, फ्रान्सच्या अक्षेल रोपेर्त, मेक्सिकोच्या क्लौडिया सांते लूस, ग्रीसच्या ओल्गा मलेआ, पेंनी पनियाटोपौलू,एलिना पसकौ, मारिया डोउझा, भारतातील रुथ झाबवाला, सुमित्रा भावे या बत्तीस दिग्दर्शिकांच्या चित्रपटांचा समावेश या महोत्सवात होता. फक्त महिलांचेच विषय न हाताळता सामाजिक, राजकीय विषयांवर आधारित चित्रपट या दिग्दर्शिकांनी हाताळलेले आहेत. निर्मात्या म्हणूनही असंख्य महिलांची नावे या महोत्सवाच्या निमित्ताने पुढे आली.
काही चित्रपटांनी निराशा केली
इफ्फीमध्ये असेही काही चित्रपट होते कि त्यांची निवड कोणत्या आधारावर केली गेली अशी शंका अनेकांच्या मनात येउन गेली . ना चांगल्या कथेचा बेस,सुमार दिग्दर्शन आणिक गोष्टींच्या उणीवा यामुळे चित्रपट रसिकांना आवडला नाही. चित्रपट सुरु असतानाच अनेकजण उठून जायचे. निवड समितीवर तोंडसुख घेणारेही अनेकजण इथे भेटले. भरगच्च कार्यक्रम, चांगले चित्रपटांचे पुन्हा प्रक्षेपण न होणे, तिकीट पद्धत, हॉल भरला म्हणून आत न सोडणे, व्यवस्थापनात ढिसाळ पणा या साऱ्यामुळेहि अनेकजण त्रस्त झाले. सर्वात जास्त त्रास झाला तो तिकीट काढण्याच्या व्यवस्थेचा आणि तिकीट नाही म्हणून लावाव्या लागलेल्या भल्या मोठ्या रांगेचा. तिकीट पद्धत कशासाठी? हा प्रश दर वर्षी उभा राहतो पण त्यावर उपाय काही निघत नाही.
गर्दी खूप पण दर्दी कमी
जगभरातून- देशभरातून वेगवेगळ्या राज्यांतून आलेले चित्रपट समीक्षक, आस्वादक यांच्याबरोबरीने सिनेमा स्कूलमधील असंख्य विद्यार्थी इफ्फीसाठी आले होते. जवळजवळ सर्व चित्रपट ‘हाउसफूल’ व्हायचे इतकी गर्दी व्हायची. पण सिनेमा सुरू झाल्यानंतर केवळ १० ते १५ मिनिटे बसून लगेच उठून जाणारे अनेकजण बघायला मिळाले. ज्या सिनेमामध्ये सेक्सने भरलेली भरपूर दृश्य आहेत अशा सिनेमांना जास्त गर्दी हे समीकरणच बनून गेले होते. सिनेमा स्कूलचे विद्यार्थी नेमकं सिनेमातील काय बघायला आले होते असा प्रश्न पडत होता. चांगल्या सिनेमांकडे पाठ आणि भरपूर ‘हॉट सीन’ असलेल्या सिनेमांना गर्दी अशी जाणवणारी परिस्थिती यावर्षीच्या महोत्सवात होती.
Sunday, August 11, 2013
सत्तेतील सहभागाचे आशादायक चित्र
त्र्याहत्तराव्या घटना दुरुस्तीमुळे एक महत्वाचा बदल झाला. महिलांना ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि नगरपालिका - महानगरपालिका यामध्ये ३३ % आरक्षण मिळाल्यामुळे त्या सत्तेत प्रत्यक्ष सहभागी झाल्या. हा निर्णय सहजासहजी पचवणे शक्य नव्हते. विशेषतः राजकारणातील पुरुषांकडून या निर्णयाबाबत उलट सुलट बोललं जाऊ लागलं. सत्तेत नव्याने सहभागी होणाऱ्या महिलांना सतत या न त्या कारणाने 'टार्गेट' केलं जाऊ लागलं. १९९३ साली समंत झालेल्या या घटना दुरुस्तीला यावर्षी बरोबर वीस वर्ष पूर्ण झाली. हा वीस वर्षाचा काळ खूप महत्वाचा होता. या काळात अनेक चढ उतार महिलांना अनुभवायला मिळाले. पडल्या शिवाय पोहायला येत नाही असं म्हणतात ते अगदीच खरं आहे. ३३% आरक्षण मिळालं नसतं तर आज राजकारणात जेवढ्या महिलांचा प्रत्यक्ष सहभाग आहे तो असला असता का? असा प्रश्न पडतो.
सुरुवातीचा खडतर काळ -
आरक्षण मिळालं पण महिला पुढे यायला तयार नव्हत्या. राजकारण हे आपलं काम नाही हि मानसिकता जोपासणाऱ्या महिलांना त्या कोषातून बाहेर काढण्याचं मोठ्ठ काम स्वयंसेवी संस्थानी केलं. कुटुंबातून न मिळणारे प्रोत्साहन, गावातील प्रस्थापित राजकारण्यांची वाटणारी भीती, आपण हे काम करू शकणार नाही याचा स्वतःच्याच मनात असेलला न्यूनगंड या साऱ्यांमुळे सुरुवातीच्या काळात आरक्षण मिळून देखील महिला राजकारणात सहभागी होण्यास घाबरत होत्या. त्यामुळे सुरुवातीच्या काळात अनेक ठिकाणी प्रस्थापित राजकारणी कुटुंबातील महिलेलाच यात पुढे करण्यात आले. तिच्यासाठी देखील हे सगळं नवीनच होतं. आरक्षण मिळण्यापूर्वी महिलांचे प्रबोधन होणे गरजेचे होते ही बाब देखील शासकीय पातळीवर याच काळात लक्षात आली आणि शासकीय यंत्रणेतून महिलांना प्रशिक्षण देणारी यंत्रणा उभी राहिली शिवाय या कामासाठी अनेक स्वयंसेवी संस्था पुढे आल्या.
दहा वर्षांपूर्वी राष्ट्रीय महिला आयोगाच्या माध्यमातून सातारा, सांगली आणि सोलापूर या भागातील ग्रामपंचायत - जिल्हापरिषद मधील महिला सदस्यांसाठी त्या त्या भागात प्रशिक्षण कार्यक्रम आमच्या संस्थेच्या माध्यमातून आयोजित केला होता. यात एक सत्र त्यांना कामात येणाऱ्या अडचणींच होतं. स्वतः कलेक्टर, जिल्हापरिषद अध्यक्ष या सत्रात उपस्थित राहून महिला सदस्यांच्या अडचणी जाणून घेत होते. सुरुवातीला वाटलं की कदाचित महिला काही बोलणारच नाहीत, त्यांना बोलतं करावं लागेल. पण महिला फक्त बोलल्याच नाही तर खूप महत्वाच्या गोष्टी त्यांनी समोर मांडल्या. पुरुष सदस्य आणि महिला सदस्य यांच्यात केला जाणारा भेदभाव. बी. डी. ओ कडून मिळणारे असहकार्य, अनेक महत्वाच्या समस्या वारंवार मांडून देखील त्याची दखल न घेणं. ज्या विकास कामांसाठी निधी मागितला असतो त्यासाठी न देता भलत्याच वेगळ्या कामासाठी निधी मिळणं अशा अनेक समस्या या महिला सांगत होत्या. या समस्यांच्या माध्यमातून या सर्व महिलांची क्रियाशीलता जाणून आली. राजकारणातील त्यांचा सहभाग हा केवळ नावापुरता राहिलेला नाही हे दिसून येत होतं.
विकास प्रकल्पांना अधिक प्राधान्य -
मध्यंतरी एका राष्ट्रीय संस्थेने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिलांचं सर्व्हेक्षण केलं होतं. निवडून आलेल्या महिलांनी आपापल्या भागात कशा प्रकारचे काम केलं आहे? त्यांचा भर प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या कामावर आहे? आणि केलेल्या कामामुळे कोणता मोठा बदल घडून आला आहे? पुरुष सदस्यांच्या तुलनेत महिला सदस्यांचे काम कसे आहे? साधारणपणे या मुद्द्यांचा शोध घेणे हा सर्व्हे करण्यामागचा हेतू. भारतातील काही प्रमुख राज्यांमध्ये आणि त्यातून काही निवडक जिल्ह्यांमध्ये हा सर्व्हे घेण्यात आला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ६७% महिला प्रतिनिधींचे काम हे पुरुष सदस्यांपेक्षा अधिक चांगले असल्याचे, ६२% महिला प्रतिनिधी या दृश्यात्मक विकासाला अधिक प्राधान्य देणाऱ्या आणि ५८% महिला प्रतिनिधींनी आपापल्या भागात प्रत्यक्ष विकास कामे केल्याचे या सर्व्हेमधून पुढे आले.
मगरसांगवी हे सोलापूर जिल्ह्यातील छोटंसं गाव. या गावात अनेक वर्षांपासून पारधी कुटुंब राहतात. प्रत्यक्ष गावात म्हणता येणार नाही गावकुसाच्या बाहेर या पारधी कुटुंबांची पालं आज हि आहेत. जेव्हा पारधी पुनर्वसन प्रकल्प सुरु झाला तेव्हा या कुटुंबांसाठी रेशनकार्ड - जातीचा मिळावा यासाठी खूप झगडावं लागलं हि गोष्ट आहे १९९२-९३ मधील आणि बरोबर दहा वर्षानंतर याच पारधी कुटुंबातील तोळाबाई शिंदे हि महिला मगरसांगवी ग्रामपंचायतीची सरपंच झाली. शाळेत न गेलेली तोळाबाई निवडून आल्यावर ती हे सगळं काम कसं करू शकणार अशी अनेकांनी शंका काढली. परंतु सरपंच पद भटक्या विमुक्त जमातींसाठी आरक्षित असल्यामुळे तोळाबाईचीच निवड झाली. मुलगी शिकलेली असल्यामुळे मुलीला हाताशी धरून तिने अनेक गोष्टी शिकून घेतल्या आणि चांगलं काम करून दाखवलं. गावातल्या पायाभूत गरजांना अधिक प्राधान्य दिलं. पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या असल्यामुळे त्यासाठी पाण्याची टाकी बांधण्याचं काम सूरु केलं. टीका करणारे आजूबाजूला होतेच पण तोळाबाईने आपल्या कामातून त्यांचं तोंड बंद केलं. मगरसांगवीची सरपंच होण्याची संधी तोळाबाईंना दोन वेळा मिळाली.
रस्त्यापेक्षा पिण्याच्या पाण्याच्या सोयीला महत्व, गावातील देऊळ बांधून देण्यापेक्षा शाळेची इमारत बांधणे महत्वाचे, बाग-बगीचावर खर्च करण्यापेक्षा आरोग्याबाबतच्या सोयी करण्यावर महिला प्रतिनिधी अधिक प्राधान्य देतात असे दिसून आले आहे. याशिवाय ग्रामसभेत हजर राहून महत्वाचे मुद्दे मांडण्यामध्ये महिलां प्रतिनिधी अग्रेसर आहेत. राजकारणात एक वेगळा पायंडा घालण्याचा प्रयत्न त्या करत आहेत. सुरुवातीच्या काळात निवडणूक लढवायला तयार नसलेल्या महिला आज स्वतःहून निवडणुकीला उभ्या राहतात. निवडणुकीचा जाहीरनामा तयार करतात. जाहीरनाम्यात स्थानिक प्रश्नांना हात घालतात. वीस वर्षानंतर राजकारणातील महिलांच्या सहभागाचा आढावा घेत असताना निश्चितच काही चांगले बदल झालेले या उदाहरणांवरून दिसून येतात. तरीही अजून त्यांना बराच पुढचा पल्ला गाठायचाय.
मनस्विनी प्रभुणे
manswini-prabhune.blogspot.com
Sunday, July 28, 2013
मैत्रीचे ऋणानुबंध..
कधी कोणाशी कसे ऋणानुबंध जुळतील हे सांगता येत नाही. माधवी देसाई यांच्याशी असलेले मैत्रीचे ऋणानुबंध असेच काहीसे खूप अनपेक्षितपणे जुळले. खरंतर त्या माझ्या आज्जीच्या वयाच्या होत्या पण या मैत्रीच्या नात्यात त्यांचं वय कधी जाणवलंच नाही. बी.ए किंवा एम.ए ला असताना आम्हाला स्त्री लिखित आत्मचरित्रांचा समीक्षात्मक अभ्यास असा विषय होता. त्यावेळेला माधवीताईचे 'नाच ग घुमा' वर सविस्तर चर्चा ऐकली होती. आपल्याला शिकवणारी व्यक्ती कोणत्या दृष्टिकोनातून ती साहित्यकृती शिकवते त्यावर आपलही एक मत तयार होतं असा तो विद्यार्थी दशेतील काळ होता. त्यावेळेला पु. ल. देशपांडे यांच्या पत्नी सुनीती देशपांडे यांचे ' आहे मनोहर तरी', विद्याधर पुंडलिक यांच्या पत्नी रागिणी पुंडलिक यांचे 'साथसंगत', प्रभाकर पाध्ये यांच्या पत्नी कमल पाध्ये यांचे ' बंध-अनुबंध' इत्यादी आत्मचरित्र अभ्यासाला होती आणि वेगवेगळ्या अर्थाने ती गाजतही होती. या आत्मचरित्रांमध्ये आपल्या आवडत्या लेखकाचे त्याच्या पत्नीने केलेले विश्लेषण अनेकांना आवडले नव्हते. त्यांच्या मनात असलेल्या प्रतिमेला यानिमित्ताने धक्का बसला होता आणि यात माधवी देसाई यांचं ' नाच ग घुमा ' हे देखील होतं. आम्हाला शिकविणाऱ्या प्राध्यापिका या रणजित देसाई यांच्या साहित्याच्या निस्सीम वाचक त्यामुळे माधवी देसाई यांनी लिहिलेल्या आत्मचरित्राकडे त्या थोड्या पूर्वग्रहदुषित नजरेने बघायच्या आणि त्यांच्या शिकवण्यातून ते आमच्या पर्यंत पोहोचायचं. त्याचा फारसा परिणाम आमच्यावर झाला नाही. ती लेखकाची पत्नी आहे म्हणून तिच्या साहित्यकृतीचे मूल्यमापन त्याच निकषांवर न करता ती एक स्त्री आहे तिचंही काही वेगळं मत असू शकतं या दृष्टीकोनातून त्या-त्या आत्मचरित्रांकडे बघितलं असता त्या आत्मचरित्राचे वेगळेपण आणि महत्व लक्षात येऊ शकते. हे मनाशी पक्के असल्यामुळे यातील कोणत्याही लेखिकेबद्दल कोणताही पूर्वग्रह आमच्या मनात तयार होऊ शकला नाही. माधवी देसाई या त्यातील एकच.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना वाटलं नव्हतं कि माधवीताईशी स्न्हेहाचे - जिव्हाळ्याचे संबंध जुळतील. ' नाच ग घुमा' वाचत असतना मनात अनेक प्रश्न उभे राहायचे आणि फक्त नाच ग घुमाच ' नाही तर वर उल्लेख केलेल्या सर्वच आत्मचरित्र वाचताना त्या त्या लेखिकेच्या संदर्भात काही न काही प्रश्न मनात येतात मात्र माधवीताईना ते प्रश्न विचारण्याची संधी मला मिळाली. कधी त्यांच्याशी बोलून तर दिवाळी अंकाला त्यांनी दिलेल्या लेखांमधून हि उत्तरं मिळत गेली. त्यांच्या आयुष्याचे अनेक वेगवेगळे आयाम होते. त्या त्या कोनातून बघितलं तर आयुष्याचा तो तुकडा खूप निराळाच वाटून जायचा. काचकवड्यांच्या नक्षीप्रमाणे किंवा कॅलिडीओस्कोप जसा फिरवू तशी प्रत्येक वेळेस वेगळीच नक्षी साकारते त्याप्रमणे त्यांचं आयुष्य वेगवेगळ्या तुकड्यांमधून दिसायचं. कधी जमून आलेले तर कधी न जमलेले.
मराठी चित्रपटसृष्टीत ज्यांना चित्रतपस्वी म्हणाले जाते ते भालजी पेंढारकर आणि प्रसिद्ध अभिनेत्री लीला पेंढारकर यांच्या त्या कन्या होत्या. चित्रपटसृष्टीतील अनेकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्या संबंधीच्या खूप वेगळ्या आठवणी त्यांनी जपून ठेवल्या होत्या ज्या त्यांच्याशी बोलताना अनेकदा ऐकायला मिळायच्या. त्या आठवणी शब्दबद्ध करायला हव्या होत्या असं आता वाटतंय. त्यांना कधीही भेटलं तरी त्या कायम पांढरीशुभ्र साडी आणि डोक्यावर पदर अशाच वेशात असायच्या. अगदी अलीकडच्या काळात त्यांना घरात गाऊन घातलेलं बघितलंय पण तो देखील पांढराशुभ्र ! एकदा गप्पा मारत असताना न राहवून या पांढरी साडी आणि डोक्यावरून किंवा दोन्ही खांद्यावरून पदर घेण्याबाबत विचारलं असता त्या म्हणाल्या ' भालजी म्हणजे माझे बाबा… यांना कायम असाच पेहराव आवडायचा. त्या काळात त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या सर्व स्त्री कलाकार कटाक्षाने पांढरी साडीच नेसायच्या. बाबांना आवडायचं म्हणून मी देखील नेसू लागले… आणि मीच काय पण लता मंगेशकर, सुलोचनाताई या त्यावेळेला भालजींबरोबर कोल्हापूरच्या स्टुडीओमध्ये काम करणाऱ्या अन्य महिलांवरही भालजींच्या या विचाराचा प्रभाव होता त्यामुळे त्याही पांढरी साडी नेसू लागल्या. आणि आणखी एक रहस्य आहे ज्याची तुला कदचित अतियोशक्ती वाटेल पण राजकपूरवर देखील भालजींच्या नायिका, त्यांच्या आसपास असणाऱ्या महिलांचा प्रभाव होता. पृथ्वीराज कपूर आणि भालजी यांची खूप चांगली मैत्री होती. सुट्ट्यांमध्ये पृथ्वीराज कपूर आपल्या सर्व कुटुंबियांसमवेत कोल्हापूरला पन्हाळयाला यायचे. राज कपूर तेव्हा खूप लहान होता. आमच्या घरातील सर्व स्त्रिया तेव्हा खास करून पांढरी साडी नेसायच्या. माझी आई लीला पेंढारकर हि देखील पांढरी साडी नेसायची. छोटा राजचं कायम ती लाड - कौतुक करायची. तो हि तिच्या मागे-पुढे असायचा. या सगळ्याचा परिणाम म्हण किंवा प्रभाव… त्याच्या नायिकांचा एक तरी शॉट पांढऱ्या साडीत असायचा.' माधवीताई बरोबर अचानकपणे राज कपूरचं एक रहस्य समजून गेलं. त्यांच्याशी गप्पा त्या याच असायच्या.
मी पहिल्याच दिवाळी अंकाची तयारी करत होते. त्यावर्षीचा दिवाळी अंकाचा विषय होता 'आई'. एका प्रसिद्ध अशा अभिनेत्रीची मुलगी म्हणून माधवीताईचा लेख मला महत्वाचा वाटला. वयाची पाच - सहा वर्ष होई पर्यंत त्यांना माहित नव्हतं कि आपल्या घरात कधी तरी अधून - मधून येणारी, सुंदर दिसणारी हि स्त्री म्हणजे आपली आई आहे. कळत नव्हतं तेव्हापासून त्या त्यांच्या आज्जीकडे होत्या आणि त्यांची आई म्हणजे लीलाबाई सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांना मुलांना भेटायला वेळ मिळायचा नाही. कधी घरी आलेली असताना दारा मागून आपल्या आईला न्याहाळताना त्यांना माहितच नव्हतं कि हि आपली आई आहे. इतकाही आईचा सहवास त्यांना मिळत नव्हता. आई - मुलीचं नातं मला खूप वेगळं वाटलं. दिवाळी अंक प्रसिद्ध झाल्यावर माधवीताईकडे गेले होते. आपल्या आई बद्दलच्या भावना त्यांना व्यक्त करायला मिळालं याचं त्यांना एवढं समाधान वाटत होतं की बोलताना त्यांना खूप भरून आलं होतं. त्यावेळची स्तब्धता - शांतता न बोलताही आई आणि मुलीच्या नात्याबद्दल बरंच काही बोलून गेली.
बांदिवडेतील (बंदोडा) महालक्ष्मी मंदिराच्या आवारात असलेलं 'नर्मदा' हे त्यांचं घर ही माझी खूप आवडती जागा. या घराच्या ओसरीत बसलं कि समोर महालक्ष्मी मंदिरातील दीपस्तंभ दिसतो. मंदिरात येणारी जाणारी वेगवेगळ्या प्रकरची माणसं दिसतात. मी त्यांना खुपदा मजेने म्हणायचे ' माधवीताई मला दत्तक घ्या ना. म्हणजे मला हे घर मिळेल… इथे राहायला मिळेल.' त्या जागेचा खूप मोठा इतिहास आहे. त्यांचं पहिलं लग्न गोव्यातील आणि बांदिवडेतील जमीनदार काटकर कुटुंबात झालं होतं. आपल्या पहिल्या पतिच्या निधनानंतर त्यांना वाटणीमधून हे घर मिळालं. ज्याला त्यांच्या सासूचं नाव आहे. त्यांचं दुसरं लग्न रणजित देसाई यांच्या बरोबर झालं जे फार काळ टिकलं नाही. ' माझ्या सासू बाई खूप दूरदृष्टी असलेल्या बाई होत्या. माझ्या आयुष्यात येणारी वादळं कदाचित त्यांना आधीच जाणवली होती. त्यामुळे मला किमान डोक्यावर छप्पर तरी असावं म्हणून त्यांनी हे घर माझ्या नावावर केलं असावं. म्हणूनच मी याच घरात शेवटचा श्वास घ्यावा… हीच माझी आता इच्छा आहे.' असं एकदा ओसरीत गप्पा मारत असतना आणि घराचा इतिहास सांगत असताना त्या बोलून गेल्या. मी त्यांच्या या वास्तूच्या प्रेमातच होते. पणजीमधील पत्रकार मैत्रीण कालिका बापट आणि लीना वेरेकर यांना घेऊन माधवीताईच्या घरी गेले होते. त्या दोघीही त्यांना पहिल्यांदाच भेटणार होत्या. त्यांचा अगत्य मी खुपदा अनुभवलं होतं. नुसती उभ्या - उभ्या भेटून जाणार आहे असं जरी आधी सांगून ठेवलं असलं तरी त्या कधीही भरपेट खायला घातल्याशिवाय सोडायच्या नाही. त्याही दिवशी असंच झालं. साग्र-संगीत असा त्यांनी स्वतः केलेला स्वयंपाक बघून या दोघी चकित झाल्या. सुंगटाचे हुमण, तळलेले बांगडे, वेल्ल्या आणि सोलकढी असा बेत त्यांनी केला होता. या वयातही त्यांच्यात असलेला उत्साह आम्हाला तिघींना लाजवेल असाच होता. घरातील साफसफाई त्या स्वतः करायच्या. त्याचं स्वयंपाक घर, मोजक्याच पण नीट- नेटक्या ठेवलेल्या वस्तू, त्यांचं लिखाणाचं टेबल, हॉलमध्ये असणारे देवघर, मुलींसाठी असलेली आणि जिच्यात माझा जास्त जीव आहे ती वरच्या मजल्यावरची खोली असं सगळं म्हणजे त्याचं विश्व होतं.
त्यांच्या आयुष्यातला शेवटचा टप्पा त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने अनुभवला. याच काळात त्यांच्याशी जास्त संवाद घडू लागला. आजूबाजूला अस्वस्थ करणाऱ्या सामाजिक - राजकीय घडामोडी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हत्या मग तो गोव्यातील शाळांमधील भाषा माध्यम प्रश्न असेल किंवा महिलांवरील अत्याचाराच्या घटना त्या उघडपणे तत्कालीन कामत सरकारच्या विरोधात- त्यांनी घेतलेल्या निर्णयांच्या विरोधात बोलत होत्या. वृत्तपत्रात लिहित होत्या. तुम्हाला एवढं रोखठोक लिहिताना भीती वाटत नाही का? असं विचारलं असता, 'छे ग बिलकुल नाही… मला बिचाऱ्या म्हातारीला कोण काय करणार? आता राहिलं काय आहे तेव्हा?' असं म्हणायच्या. महिलांवरील अत्याचाराच्या घटना सर्वत्र वाढत असताना त्यांना आमच्या प्रकल्प गावातील - ग्रामीण भागातील महिलांशी , किशोरी वयातील मुलींशी चर्चा करायची होती. या मुली - महिला सध्याच्या काळात कसा विचार करतात हे जाणून घ्यायचं होतं. तसा एक कार्यक्रमही आम्ही ठरवत होतो परंतु दिवसेंदिवस खालवत चाललेली त्यांची प्रकृती साथ देत नव्हती. तरी देखील फोन करून त्या वेळोवेळी माहिती घायच्या. वृद्धापकाळात अनेकांना एकटेपण जाणवत. पण माधवीताई एकट्या असून ही त्या अर्थाने कधीच एकट्या नव्हत्या. फोंड्यात सुरु करण्यात आलेल्या महिला साहित्य संमेलनाच्या निमित्ताने त्यांनी महिलांना चांगलं वाचायला शिकवलं, नामवंत लेखिकांना त्यांनी ग्रामीण भागातील महिलांसाठी गोव्यात बोलावलं त्यांच्याशी संवाद घडवून आणला. हे सगळं करणं आणि ते देखील वयाची सत्तरी उलटून गेलेली असताना एवढं सोप्पं नक्कीच नव्हतं. संमेलन म्हणलं कि त्यांच्या अंगात जो उत्साह संचारायचा कि पुढचे काही दिवस त्याच्याच डःऊण्डःईट असायच्या.
नामवंत दिग्दर्शक आणि प्रसिद्ध अभिनेत्री यांची मुलगी असताना अनुभवलेले वैभव, वलयांकित जीवन तर दुसऱ्या क्षणाला गोव्यातील ग्रामीण भागातील मुलाशी लग्न करून एक सामान्य जीवन जगणारी मुलगी, संसारात रमलेली असताना अचानक पतीच्या मृत्यूने बदलून गेलेलं तिचं जग, परत दुसरं लग्न करून नवी स्वप्नं बघणारी… स्वतःच्या सुखापेक्षा मुलींना पित्याचा आधार हवा या विचाराने झटणारी आई, लेखक पतीची मनातील प्रतिमा एक आणि प्रत्यक्ष प्रतिमा वेगळी हे कळून चुकल्यावर स्वतःशी आणि स्वतःच्या आत्मसन्मानासाठी झगडणारी पत्नी… आयुष्यात आलेले अनुभव कागदावर मांडणारी लेखिका, गोवा मुक्ती संग्रामात भूमिगत होऊन काम करणाऱ्या, सामाजिक मन आणि जाण जपणाऱ्या अशा अनेक भूमिका जणू एखाद्या चित्रपटातील नायिकेसाठी लिहिलेल्या असाव्यात अशा माधवीताई प्रत्यक्षात जगल्या. त्या त्या टप्प्याला त्या भूमिकेला न्याय दिला. एकाच व्यक्तीच्या आयुष्यात किती चढ उतार असू शकतात हे माधवीताईकडे बघितलं कि समजू शकतं.
गेल्या वर्षी 'गोव्यावर' दिवाळी अंक करत असताना त्यांच्याकडे गेले होते. त्या वेळेस त्या खूप आजारी होत्या. गोव्यावर दिवाळी अंक करतेय आणि नेमकी आजारी असल्यामुळे काही लिहू शकत नाहीत. याचं त्यांना वाईट वाटतं होतं. पुढच्या वर्षीच्या अंकात लिहिण्यासाठी आधी ठणठणीत बऱ्या व्हा. अजून खूप विषय आहेत ज्यावर तुम्हाला लिहायचं असं म्हणून आले होते. गेल्या तीन चार आठवड्या पासून त्यांच्या घरातला फोन उचलला जात नव्हता. त्यांना यावर्षीच्या दिवाळी अंकाविषयी सांगायचं होतं… आता ते राहूनच गेलं. बऱ्याच गोष्टी आम्ही ठरवल्या होत्या त्या ही अर्धवट राहिल्या. मागे एकदा अख्खा दिवस त्यांच्या घरी घालवला असताना त्यांच्या घराचे भरपूर फोटो काढले होते. त्यांच्या घरात वरच्या खोलीत जाणाऱ्या पायऱ्या आहेत त्यावर बसून मला त्यांचा फोटो घ्यायचा होता. त्यांना आग्रह केला तर म्हणाल्या ' आज नको परत कधी तरी आज मी छान नाही दिसत. खूपच म्हातारी वाटतेय. पुढच्या वेळेस आलीस ना कि सांग म्हणजे जरा तरुण बनून तुला फोटोसाठी पोझ देईन… ' आणि वर आम्ही इतक्या खळखळून हसलो होतो. त्यांचे तसे तरुण बनून येणे राहूनच गेले. खूप उशीरा त्यांच्याशी मैत्री झाली… आणखी काही वर्ष मिळायला हवी होती.
Sunday, June 30, 2013
विवाहविषयक कायदा : बदलांची नांदी
गेल्या आठवड्यात खळबळ उडेल अशीच एक घटना घडली आणि हि गोष्ट प्रसारमाध्यमांनी आपापल्यापरीने रंगवून सांगितली त्याचा परिणाम असा झाला कि त्या निर्णयाचे गांभीर्य बाजूला राहून भलत्याच विषयांची सुरुवात झाली. ' लग्न न करता शरीरसंबंध ठेवणाऱ्या स्त्री -पुरुषांना आता न्यायालयाकडून पती-पत्नीचा दर्जा मिळणार ' अशा शीर्षकाची बातमी कुठल्या तरी वृत्तवाहिनीवर वारंवार प्रसारित होत होती. लग्न न करता ' लिव्ह इन रिलेशनशिप ' मध्ये असणाऱ्या मुला -मुलींना वाटून गेलं, आता हा काय नवीन घोळ? ' नवरा -बायकोचं ' नातं नको म्हणून 'लिव्ह इन' चा मार्ग शोधला पण कोर्ट आता यालाच पती -पत्नीचा दर्जा द्यायला निघालाय कि काय? तर महिलांमध्ये एक वेगळीच चर्चा सुरु झाली आपल्या नवऱ्याने जर एखाद्या दुसऱ्या महिलेबरोबर शरीरसंबंध ठेवले तर तिला देखील पत्नीचा दर्जा मिळणार कि काय?… अशी बऱ्याच प्रकाराने चर्चा ऐकायला मिळत होती. असा कसा निर्णय असू शकतो हे ऐकताच क्षणी वाटून गेलं. बातमी खूप अर्धवट माहिती देणारी वाटत होती. कोणती तरी घटना आहे, याचिका आहे ज्यावर निर्णय देताना मद्रास हायकोर्टाच्या न्याधीशांनी बरच काही सांगितलं असणार पण नेहमीच्या सवयीने, त्यावर फारसा अभ्यास न करता, सर्वांच्या आधी बातमी दाखवण्याच्या स्पर्धेने एक नवीनच बातमी जन्माला घातली. सोशलनेटवर्किंग साईटवर ज्याच्या त्याच्या वॉलवर, 'स्टेटस ' वर मद्रास हायकोर्टाचा निर्णय या बातमीच्या रूपाने झळकत होता.
प्रत्यक्ष मद्रास हायकोर्टाने दिलेला निर्णय :
एका मुस्लिम महिला याचीकाकर्तीच्या याचिकेवर निर्णय देताना मद्रास हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी दिलेला हा अत्यंत महत्वाचा निर्णय आहे. 'धार्मिक विधीपूर्वक विवाह हि केवळ एक रूढी आहे. ती सक्ती नाही. त्यामुळे या प्रकरणातील वादी (याचीकाकर्ती महिला) व प्रतिवादी (तिचा नवरा) यांना हे कोर्ट स्वतःची स्वतंत्र ओळख कायम ठेवणारे, सर्वसाधारण आयुष्यातील परस्परांचे जोडीदार समजते. मुलाला जन्म देण्यापूर्वी वादी महिला आणि लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी प्रतिवादी पुरुष असे दोघेही अविवाहित होते याबद्दल वाद नाही. एका छताखाली त्यांनी वैवाहिक जीवन व्यतित केले व त्यांना दोन मुलेही झाली. त्यामुळे वादी महिलेस 'पत्नी'च्या आणि पुरुषास 'पती'चा दर्जा देणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळेच त्यांना झालेली मुले हि औरस आहेत आणि वादी हि प्रतीवादीची औरस पत्नी आहे. हे कोर्ट असा दृष्टीकोन मांडते आहे कि वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या महिलेने जर वयाची २१ वर्ष पूर्ण केलेल्या पुरुषाशी लैंगिक संबंध ठेवले आणि त्यातून ती गरोदर राहिली तर ती महिला त्या पुरुषाची पत्नी व तो पुरुष त्या महिलेचा पती समजला जाईल. अशा संबंधातून ती महिला गरोदर राहिली नाही, परंतु असे संबंध असल्याचा पुरेसा कागदोपत्री पुरावा उपलब्ध असेल तर अशा जोडप्यांना पती - पत्नी समजावे. असे संबंध असलेल्या जोडप्यांमध्ये जर बेबनाव झाला तर 'पत्नी'शी कायदेशीर घटोस्फोट घेतल्याशिवाय 'पती' दुसरा विवाह करू शकत नाही.'
या निर्णयात कोर्टाने फक्त महिलेची बाजू न बघता मुलांच्या भावविश्वाचा विचार केलेला दिसतो. आपली जबाबदारी झटकण्यासाठी मुलांना अनौरस ठरवून समाजाच्या एक प्रकारच्या जाचत ढकलून देण्याचा प्रयत्न इथे कोर्टाने हाणून पडला आहे. आपल्याला सोडून गेलेल्या नवऱ्याकडून पोटगी मिळावी या करता महिलेने न्यायालयात धाव घेतली असता त्यावर तिच्या या नवऱ्याने आपले या महिलेशी लग्न झाले नव्हते आणि हि मुले आपली नाहीत अशी मांडणी न्यायालयात केली. औपचारिक विवाह पद्धतीप्रमाणे विवाह झाल्याचे कोणतेही पुरावे नसल्यामुळे या महिलेला आणि तिच्या दोन मुलांना सोडून गेलेल्या तिच्या नवऱ्याला त्याच्या जबाबदारीची नुसतीच जाणीव नव्हे तर त्यातील गांभीर्य लक्षात यावे यादृष्टीने हा निर्णय खूप महत्वाचा वाटतो. लग्न झाल्याचा पुरावा नाही पण मुलांच्या जन्माच्या वेळेस दवाखान्यातील कागदपत्रांवरील मुलांचा पिता म्हणून सही केल्याचा पुरावा न्यायालयाने ग्राह्य मानला आणि आपल्याच मुलांना अनौरसपणाचा शिक्का मारणाऱ्या स्वार्थी पित्याला या निर्णयातून अद्दल घडविली आहे.
भारतात प्रत्येक धर्मानुसार वेगवेगळे विवाह विधी आहेत. विवाह विषयक वेगवेगळ्या रूढी परंपरा आहेत आणि या सर्वांचा विचार करून त्याप्रमाणे आपल्याकडील न्यायव्यवस्थेत विवाह विषयक वेगवेगळे कायदेही आहेत. अनेकजण यातून पळवाटा शोधत असतात. शाहबानो केस मधील निर्णयाची कायम चर्चा होत असते त्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या एका मुस्लिम महिलेला न्याय मिळवून देताना न्यायाधीशांनी केलेली टिप्पणी त्या अर्थाने महत्वाची वाटते. शिवाय प्रेमविवाहास घरातल्यांचा विरोध म्हणून पळून जाऊन लग्न केलेल्या मुलीच्या हातात त्या परिस्थितीत लग्न झाल्याचा कोणता पुरावा असणार आणि असं लग्न फसलं गेलं तर त्या मुलीला कोणत्या गोष्टीच्या आधारावर न्याय मिळणार याचा विचार केला असता मद्रास हायकोर्टाचा निर्णय म्हणजे एक महत्वाचं पाऊल मानावे लागेल. अशा प्रकारच्या लग्नात अनेकदा मुलींची फसवणूक होत असते. या निर्णयामुळे या पद्धतीच्या फसवणुकीच्या घटनांना आळा बसू शकतो
न्यायालयाने दिलेला निर्णय लग्न करून फसवल्या गेलेल्या महिलांच्या आर्थिक सुरक्षितेच्या दृष्टीने उचलेले योग्य पाऊल आहे असे वाटते. लग्न न करता एकत्र राहणाऱ्या जोडप्यांना देखील या निर्णयाने चपराक बसली आहे. निव्वळ शारीरिक सुखासाठी एखाद्या महिलेचा वापर करून घेणाऱ्या आणि संबंधातून जन्माला आलेल्या मुलांची आणि तिची जबाबदारी नाकारु शकणाऱ्या पुरुषांवर न्यायालयाची भिस्त आहे. पण या निर्णयातील मूळ भाग समजून न घेता, त्यातील गांभीर्य लक्षात न घेता सनसनाटी निर्माण करण्यात धन्यता बाळगणाऱ्या प्रसारमाध्यमांनी मात्र यानिमित्ताने आपली पोळी छान भाजून घेतली.
Subscribe to:
Posts (Atom)